वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरा मुत्सद्दी माणूस म्हणावं लागेल. रोमच्या व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन गोवा आणि मणिपूरच्या मतदारांना मोहिनी घातली; तर बाबा केदारनाथचं दर्शन घेऊन यूपी आणि उत्तराखंडच्या मतदारांना प्रभावित केलं. कदाचित याच कलागुणांमुळे मोदी नावाचा “सिक्का’ भारताच्या राजकारणात खणखणताना दिसत असावा!
पंतप्रधान मोदी हे दूरदर्शी राजकारणी आहेत. जी-20 देशांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ते अलीकडेच रोमला गेले होते. यासोबतच पंतप्रधानांनी व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. यूपी, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यातील गोवा आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये सत्तेची किलली ख्रिश्चन मतदारांच्या हातात आहे. पंतप्रधान आणि पोप यांची ही भेट या दोन्ही राज्यांतील मतदारांना प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
देशातील ख्रिश्चन समुदायाची भेट घेऊन जे वातावरण तयार होऊ शकलं नसतं ते वातावरण पोप यांच्या भेटीमुळे तयार झालं आहे, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. ईशान्येकडील राज्यांमध्ये होणाऱ्या धर्मांतर विरोधाचा मुद्दा भाजपने नेहमीच रेटून लावला आहे, हेही विसरून चालणार नाही. अशात, पंतप्रधानांनी रोममध्ये पोपची भेट घेणं यास केवळ योगायोग म्हणता येणार नाही. यानंतर पंतप्रधान बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेले.
तसं बघितलं तर हा श्रद्धेचा विषय आहे. परंतु, बाबा केदारनाथच्या दर्शनामुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मतदार प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. एक भेट पोपची आणि एक बाबा केदारनाथची अशा दोन धार्मिक भेटी घेऊन पंतप्रधानांनी चार राज्यांतील मतदारांना थेट प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पक्षाला यूपीची चिंता लागली आहे. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही याची प्रकर्षाने जाणीव झाली. कार्यकारिणीची बैठक दोन वर्षांनंतर होत आहे. तसं बघितलं तर ती दर तीन महिन्यांनी व्हायला पाहिजे.
भाजपची खरी चिंता वाढविली आहे ती अलीकडेच 14 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालाने. पश्चिम बंगालचा निकाल तर पायाखालची जमीन सरकविणारा आहे. येथील चारही जागांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले. या निकालाची खरी भयानकता अशी की, भाजपच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप मुख्य विरोधी पक्ष बनला होता. परंतु, पोटनिवडणुकीत भाजपची जादू चालली नाही. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संधी आणि आव्हानासह विविध मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, पूर्ण चर्चा पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीच्या अवतीभोवती झाली.
यूपीत भाजपचा मुख्य मुकाबला समाजवादी पक्षासोबत असला तरी; अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं खेळलेला डाव भाजपला चिंतेत टाकणारा आहे. आम आदमी पक्षानं “रामराज्य’ आणि “राष्ट्रवाद’ची घोषणा देत 2022 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत धार्मिकतेचं खूप महत्त्व आहे हे केजरीवाल यांना चांगलं ठाऊक आहे. या धार्मिक भावनांची पायरी चढून उत्तर प्रदेशात पक्षासाठी जागा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. केजरीवाल पुढच्या वर्षी यूपीतील सर्व 403 जागांवर आपले उमेदवार उतरविणार आहे, हे येथे उल्लेखनीय.
दुसरीकडे, परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या नवीन वादात सापडल्या आहेत. त्याचं झालं असं की, गुयानाच्या राजदूतानी दिवाळी स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. लेखी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पार्टीतील डिप्लोमॅट कम्युनिटीला दिवाळीचा खरा अर्थ समजविण्यासाठी लेखी यांनी दोन्ही हाताची मूठ हवेत उंचावत धार्मिक नारा लावायला सांगितला. काही डिप्लोमॅटना याचा अर्थ समजला नाही आणि त्यांनी सुद्धा लेखी यांना कॉपी केले.
याच पार्टीत उपस्थित मुस्लीम देशांच्या राजनैतिकांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी स्नेहमीलन यासारख्या सामाजिक कार्यक्रमात धार्मिक/राजकीय घोषणा देणं बरोबर नाही, असं त्याचं म्हणणं होतं. यानंतर अन्य परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची गुयाना दौऱ्यासाठी नियुक्ती केली गेली. आधी या दौऱ्यासाठी लेखी यांची निवड करण्यात आली होती. गुयाना हा मूळ भारतीयांचा देश आहे.
गुलामगिरीच्या काळात इंग्रजांनी भारतीयांना मजुरी करण्यासाठी विविध देशांमध्ये नेले होते. ही मंडळी गेली होती त्याच देशात स्थायिक झालेत. गुयाना हा असाच एक देश आहे. महत्त्वाचे म्हणजे, गुयाना, सुरिनाम, टोबॅगो आणि त्रिनिदाद असे देश आहेत जेथे भारतीय वंशाचं सरकार आहे आणि हीच माणसं पंतप्रधान आणि मंत्री आहेत.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्याचं काम केलं आहे. योगी आदित्यनाथ यांना विधानसभेत पाय ठेवू द्यायचा नाही म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री कुठून लढणार? हे अद्याप निश्चित नाही.
परंतु, ते जेथून लढतील आपणही त्याच ठिकाणाहून लढू. माझं निवडणूक जिंकणं महत्त्वाचं नाही, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विधानसभेत जाऊ द्यायचं नाही हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.