नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, आमचा हा आठवा अर्थसंकल्प आहे, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 7 अर्थसंकल्पांमुळे दिल्लीच्या शाळा चांगल्या झाल्या आहेत, लोकांना मोफत वीज मिळत आहे. मेट्रोचा विस्तार झाला असून पारदर्शकता आली आहे. त्यामुळे लोकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत नाही.
दिल्लीचा अर्थसंकल्प मांडताना मनीष सिसोदिया म्हणाले की, तरुणांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे याला रोजगार बजेट असे नाव देण्यात आले आहे. कोविडमुळे मागील वर्षांत आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही कोविडचा सामना करू शकलो.
अर्थसंकल्पादरम्यान मनीष सिसोदिया म्हणाले की, आठव्या अर्थसंकल्पात आम्ही व्यवसाय आणि लोकांना दिलासा देणारा प्रस्ताव आणला असून आम्ही यावेळी रोजगार बजेट सादर करत आहोत.
गेल्या वेळचा अर्थसंकल्प देशभक्तीचा होता. अर्थसंकल्पा दरम्यान, दिल्ली सरकारने 2047 पर्यंत दिल्लीचे दरडोई उत्पन्न सिंगापूरच्या लोकांएवढे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच दिल्लीत पुढील 5 वर्षांत किमान 20 लाख रोजगार निर्माण होतील, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं.