केतकावळे -पुरंदरच्या मातीत जन्मलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने व्यवसाय करत असलेल्या बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी राज्यातील तरुण सरसावले आहेत. त्यासाठी संभाजी महाराज यांच्या जन्मभूमी पुरंदर किल्याच्या पायथ्याला शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ज्या पद्धतीने मागील काळात राजे शिवाजी महाराज यांच्या नावाने उत्पादन होणाऱ्या बिडीचे नाव बदलले. त्यासाठी राजेंच्या मावळ्यांनी महाराष्ट्रात गेल्या 80 वर्षांपासून शिवाजी बिडीचे उत्पादन होत आहे. या शिवाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी 1975 साली आंदोलन झाले. त्यावेळी या बिडीचे नाव बदलून संभाजी बिडी ठेवण्यात आले.
संभाजी महाराज यांचे देखील नाव बिडीला देऊ नये यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, अहमदनगर, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेल्या नारायणपेठ गावात शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि मच्छिंद्र टिंगरे, सुनील पालवे, रवी पडवळ, सागर पोमण, दिनेश ढगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तोपर्यंत माघार नाय…
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आत्ता नाव बदलल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. या बेमुदत उपोषणास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्र देऊन, तसेच मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड पुरंदर, शिवप्रेमी संघटना पुरंदर यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.