– हेमंत महाजन
युक्रेन-रशिया युद्ध, हमास-इस्रायल युद्धात झालेल्या चुका आणि मिळालेले धडे यापासून भारतीय सैन्य शिकत आहे. सध्या नवीन तंत्रज्ञान मिळवण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलायला पाहिजे.
सध्या 45 हून अधिक सशस्त्र संघर्ष मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या देशांत/गटांत/प्रदेशांमध्ये चालू आहेत. हे देश आहेत सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, लिबिया, मोरोक्को, पॅलेस्टाइनमधील हमास, सीरिया, तुर्कीये, येमेन, पश्चिम सहारा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, रशिया, युक्रेन आणि इतर अनेक देश. यामधील सर्वात दोन मोठी युद्ध म्हणजे दोन वर्षाहून अधिक काळ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आणि ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेले इस्रायल आणि हमास युद्ध. वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली युद्धे आणि संघर्ष, हे शस्त्रे आणि युद्धाला लागणारे तंत्रज्ञान वापरण्याची, विकसित करण्याची प्रयोगशाळा बनली आहे.
यामध्ये कुठले तंत्रज्ञान यशस्वी होते आहे आणि कुठले अयशस्वी हे तिथे चाललेल्या वापरामुळे कळते. सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रे, जुनी शस्त्रे आणि जुने-नवे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात या युद्धांमध्ये वापरले जात आहे. यामुळे सध्याच्या काळामध्ये कुठले शस्त्र किंवा तंत्रज्ञान युद्धात जास्त उपयुक्त आहे ते सिद्ध होत आहे. उदाहरणार्थ, रणगाडा विरुद्ध रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे या युद्धात जिंकली आहेत. मोठ्या लढाऊ युद्धनौका विरुद्ध क्षेपणास्त्रे, यामध्ये लांबून फायर केलेल्या क्षेपणास्त्रांचा विजय झालेला आहे. असे मानले जाते की मोठ्या युद्धनौका आणि विमाने यांचा आता फारसा उपयोग नाही.
जगातील नंबर दोनचे अत्याधुनिक नौदल आणि हवाई दल असलेल्या रशियाने या दोघांचाही या युद्धात फारसा वापर केला नाही. कारण, मोठे नुकसान झाले. अतिशय महागड्या नौका बुडवल्या गेल्या आणि महागडी विमाने शोल्डर फायर क्षेपणास्त्रांनी पाडण्यात आली. त्या ऐवजी कमी किमतीमध्ये आणि जास्त संख्येने क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन्स यांचा वापर केला जात आहे. ड्रोन्सचा वापर तर प्रचंड वाढला आहे. याशिवाय यंत्रचलित जमिनीवर चालणारी वाहने किंवा पाण्याखालून जाणार्या छोट्या सबमरीन/व्हेसल्स यांचा वापर येणार्या काळामध्ये वाढणारच आहे. म्हणून सर्व आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विश्लेषण करून, त्यामध्ये भारतीय सैन्याकरता कुठले तंत्रज्ञान योग्य आहे यावरती विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतरचे महत्त्वाचे पाऊल आहे की, जे तंत्रज्ञान आपण निवडले आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरता भारतीय सैन्याला सक्षम करणे.
2024 हे वर्ष निवडलेले तंत्रज्ञान आत्मसात करण्यास भारतीय सैन्याने जाहीर केले आहे. कारण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याकरता ट्रेनिंग आणि अनुभवाची गरज असते आणि त्याला पुष्कळ वेळ लागतो. भारतीय लष्कराचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपरसोनिक शस्त्रे, निर्देशित ऊर्जा शस्त्रे, जैवतंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान युद्धात उपयुक्त ठरताना दिसत आहेत. पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षेशी तोंड देण्यासाठी सध्या भारतीय लष्कराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे, युद्धाचे अनिश्चित स्वरूप.
भारतीय लष्कर आपल्या पायदळ, तोफखाना आणि रणगाडा बटालियनमध्ये ड्रोन आणि काउंटर ड्रोन प्रणाली एकत्रित करत आहे. कमांड स्तरावर ‘कमांड सायबर ऑपरेशन्स सपोर्ट विंग्स’ची स्थापना सायबर युद्धात क्षमता वाढविण्यावर जोर देते. याशिवाय प्रादेशिक लष्कराच्या माध्यमातून तज्ज्ञ अधिकारी भरती करून, लष्कर आपल्या मानव संसाधनाचा विस्तार करत आहे. या तज्ज्ञ अधिकार्यांमध्ये नागरी -लष्करी भरतीद्वारे सायबर तज्ज्ञ तयार केले जात आहे. ड्रोन आणि काउंटर ड्रोन प्रणाली अखंडपणे ऑपरेट करण्याच्या योजनांमध्ये लक्ष्य केंद्रित केले आहे. 2500 सिक्युअर आर्मी मोबाइल भारत व्हिजन (संभव) हॅन्डसेटच्या समावेशासह मोबाइल सायबर युद्धात सुरक्षित राहू शकते.
‘इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स’ (आयडेक्स) सारख्या उपक्रमांच्या स्थापनेसह ऑपरेशनल, धोरणात्मक आव्हानांसाठी नावीन्यपूर्ण उपायांसाठी नागरी क्षेत्र, शैक्षणिक आणि उद्योग यांच्याशी लष्कर आपले संबंध वाढवत आहे. अलीकडेच लष्कराने एक नवीन धोरण सुरू केले. ज्या अंतर्गत ‘एआय’, रोबोटिक्स आणि ड्रोन यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य असलेल्या लेफ्टनंट कर्नलन्सना कर्नल पदोन्नतीसह त्याच क्षेत्रात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे जास्त काळ ते त्या तंत्रज्ञान युनिटमध्ये काम करतील. यामुळे त्यांच्या कौशल्याचा, अनुभवाचा फायदा भारतीय सैन्याला होईल. या धोरणाचे तीन वर्षांनी पुनरावलोकन केले जाईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञान हे वेगाने बदलते आणि नवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रे निर्माण होत असतात. या तंत्रज्ञानाच्या बदलामुळे कुठले शस्त्र घ्यायचे, त्याला सैन्यात केव्हा सामील करायचे आणि असे करताना सर्वात अत्याधुनिक पण कमी किमतीत असे तंत्रज्ञान आपल्या सैन्यांमध्ये कसे येईल हे ठरवणे आणि ते आणणे अत्यंत महत्त्वाचे असते. भारतीय सैन्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान नक्कीच येत आहे; परंतु तंत्रज्ञान सामील करण्याचा आणि सैन्याने ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा वेग हा चीनपेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच येणार्या काळामध्ये चीनचे मल्टीटोमॅन युद्धाचे आव्हान आपण पेलू शकू. आपल्या युद्ध पद्धती विकसित करण्याची दिशा बरोबर आहे मात्र तिथे पोहोचण्याचा वेग वाढायला पाहिजे.