मुंबई – राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे मानिव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुसूत्रता आणली असून 13 हजार 655 अर्जांवर कार्यवाही करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सदस्य संजय पोतनिस यांनी राज्यातील गृहनिर्माण संस्थांची मानिव अभिहस्तांतरण प्रकरणी प्रलंबित असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात सहकार मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील संबंधित जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात 31 जानेवारी 2021 पर्यंत मानिव अभिहस्तांतरणाचे 14 हजार 822 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 13 हजार 655 अर्जांवर कार्यवाही करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित 1167 अर्जांवर कार्यवाही सुरु असल्याचे पाटील यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.