राहुरी (प्रतिनिधी) : सासू- सुनेचे नाते म्हटले की, भांडण ठरलेलेच. घरात रोज कशावरून तरी दोघींत वाद होतात. घरोघरी ही कहाणी आहे. मात्र, सासू व सुनेमध्ये माय- लेकीचे नाते असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. ही नात्याची घट्ट वीण शेवटपर्यंत टिकवनू ठेवण्याची घटना राहुरी तालुक्यात घडली. सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेने देखील अखेरचा श्वास घेतला. सासू व सून दोघी मिळून मृत्यूनंतरच्या प्रवासाला लागल्या. सासू-सुनेच्या अनोख्या प्रेम नात्याची कहाणी आता एक इतिहास बनली आहे.
राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात शेजूळ कुटूंब रहावयास आहे. त्या कुटुंबातील सासू मालनबाई पांडुरंग शेजूळ यांना दि. 7 जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान अचानक त्रास होऊ लागला. घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, पहाटे एक वाजे दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळातच सून मिराबाई भाऊसाहेब शेजूळ (वय 55) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सासू मयत झाल्याचे समजताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पहाटे दीड वाजे दरम्यान म्हणजे सासू मयत झाल्याच्या अवघ्या अर्ध्या तासाने सुनाने अखेरचा श्वास घेतला. सुनाने अखेरच्या श्वासापर्यंत सासूची साथ सोडली नाही. मृत्यूनंतरच्या प्रवासाला देखील दोघी बरोबरच राहिल्या.
मृत्यूनंतर सासू मालनबाई व सून मिराबाई या दोघींची अंत्ययात्रा एकामागे एक त्यांच्या घरापासून ते गणपती घाटापर्यंत नेण्यात आली. अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय व यापारी क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आजच्या काळात सासू व सुनेचे असे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली शेजूळ कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.