पिंपरी, दि. 25 – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्ता काळात पिंपरी-चिंचवडकरांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. अजित पवार यांचे बारीक लक्ष असायचे. मात्र 2017 मध्ये भाजपने सत्ता काबीज केली आणि त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. धरणात मुबलक पाणीसाठा असूनही शहराला तीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांच्या तोंडचे आणि हक्काचे पाणी पळविण्याचे हे भाजप नेत्यांचेच पाप आहे. या पापाला माफी नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.
मोशी येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाचव्या मासिक सभेत गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, रविकांत वर्पे, प्रशांत शितोळे, कविता आल्हाट, मयूर कलाटे, वसंत बोराटे, राहुल भोसले, सुनील गव्हाणे, फजल शेख, प्रशांत शितोळे, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, विनायक रणसुभे, राजेंद्र जगताप, विक्रांत लांडे, प्रविण भालेकर, अतिष बारणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाले की, प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, कचऱ्याचे नियोजन, वैद्यकीय सेवा, नाट्यगृहे, उद्याने आणि इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रवादी पक्षाने सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळेच शहरविकासाचा आलेख सातत्याने उंचावत राहिला. 2017 मध्ये सत्तापरिवर्तन झाल्याने शहराचा विकास ठप्प झाला. सत्तांध भाजप नेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे विकासाची दिशा भरकटून सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू झाले. या हालअपेष्टांचा हिशोब नागरिक मतांच्या रूपाने केल्याशिवाय राहणार नाही, असे गव्हाणे म्हणाले. यावेळी कविता आल्हाट, सुनील गव्हाणे, फजल शेख, विजय लोखंडे, सतीश दरेकर, रविकांत वर्पे आदींनी मनोगत व्यक्त केले. विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. वसंत बोराटे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले.