महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद अंगी जोपासून लोकसेवेसाठी सतत चोवीस तास कार्यतत्पर असणारे, तसेच भागातील दिनदुबळ्या, जनसामान्यांचा आधारवड बनलेले अधिकारी, अशी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. संतोष पवार साहेब यांची ओळख सर्वश्रुत आहे. त्यांचा शांत, संयमी व मितभाषी स्वभाव आणि त्यांच्यापर्यंत न्यायाची अपेक्षा घेऊन पोहोचलेल्या हरएक माणसालाही हमखास न्याय मिळवून देणारे आदर्शवत अधिकारी म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. त्यांची नुकतेच सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला अल्पसा आढावा…..
पोलीस प्रशासनात अलीकडे सिंघम, दबंग आणि रावडी राठोड प्रमाणे केवळ स्टाईल मारून चमकोगिरी करण्याचा जणू एक ट्रेंडच आला आहे. अर्थात, अशा अधिकाऱ्यांची काही कमी नाही. परंतु, महाराष्ट्र पोलीस दलाचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद प्रमाण मानून पोलीस दलात अधिकारी म्हणून भरती झालेले पोलीस निरीक्षक संतोष पवार हे अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांच्या परिस्थितीची, अडीअडचणीची आणि त्यांच्या मानसिकतेची जाण असलेले एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत.
त्यांच्यापर्यंत कसलीही तक्रार घेऊन आलेला व्यक्ती आजपर्यंत कधीही हातास, निराश होऊन परत जात नाही. या जनतेच्या बोलक्या प्रतिक्रियाच त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे. कोणत्याही बातमीला अल्पावधीत प्रतिसाद देणारे, कसल्याही गुन्ह्याचा गुंता लीलया सोडवून त्याचा छडा लावणे, ते अगदी अट्टल गुन्हेगारालाही वठणीवर आणणारे पोलीस अधिकारी, अशीही त्यांची ओळख आहे.
पाटण तालुक्यातील रुवले येथे एका अल्पवयीन युतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेबाबत संवेदनशीलता दाखवून तपासाची चक्रे वेगाने फिरवत सपोनि संतोष पवार यांनी आठ तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला होता. तसेच अंधश्रद्धेतून घडलेल्या एका घटनेचा छडा लागण्याची आशाच लोकांनी सोडली होती. असे असताना या प्रकरणाची फाईल हातात घेत सदर गुन्ह्याचा तपास करून संबंधितांना पवार साहेबांनी न्याय मिळवून दिला आहे.
अशा पोलीस प्रशासनातील अनेकविध कर्तव्याव्यतिरिक्त ‘वर्दीतला दर्दी माणूस’ अशी ओळखही त्यांनी करोना आणि अतिवृष्टी काळात मिळवली आहे. करोना कालावधीत त्यांनी पोलीस प्रशासनासह पोलीस पाटील, आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जनतेची सेवा केली आहे. तसेच अतिवृष्टी काळातही ‘हे माझे काम नाही’, असे म्हणत बसण्यापेक्षा त्यांच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस पाटलांना सोबत घेऊन जितकरवाडी (जिंती) ता. पाटण येथील पुल अतिवृष्टीमध्ये वाहून गेला असताना वाडीतील लोकांना सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढले होते. या घटनेतूनही त्यांच्यातील मायेचा ओलावा लोकांनी पाहिला आहे; अनुभवला आहे.
पोलीस प्रशासनात काम करताना आपले पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला सहकारी यांच्या प्रत्येक संकटात त्यांना खंबीरपणे साथ देणारे, पोलीस पाटलांनाही नेहमी प्रोत्साहन देणारे, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे अधिकारी म्हणूनही त्यांनी सर्वांच्याच मनात आपले आदराचे स्थान निर्माण केले आहे.
तसेच भागातील शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींना, युवक, युवतींना वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या, एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा? याची प्रतिमा सर्वांमध्ये निर्माण कर करणाऱ्या णारे अधिकारी, तसेच विविध सामाजिक उपक्रमात नेहमी उत्साहाने सहभाग करणाऱ्या, लोकांना विविध प्रकारची मदत करणाऱ्या, अशा या कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष आणि माणूसपणाची जाण असलेल्या अधिकाऱ्याची बदली होत असताना त्यांच्यासोबत दोन-तीन वर्षांत निर्माण झालेले ऋणानुबंध आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत राहतील. अशा या हरहुन्नरी, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम.
– अमित शिंदे, कुंभारगाव.