मुंबई – हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस, डोळे, स्वादुपिंड, आतडे अशा अनेक प्रकारच्या आतड्यांचे प्रत्यारोपण केले जाते. अनेक रुग्ण दात्यांच्या प्रतिक्षेत असतात. त्यानुसार दर महिन्याला मुंबईत बऱ्यापैकी अवयव प्रत्यारोपण केले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून अवयव प्रत्यारोपण बंद आहे. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण रुग्णांव्यतिरिक्त अनेक रुग्णांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.
अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केवळ आणि केवळ तत्काळ अवयव प्रत्यारोपण करण्याची गरज आहे, त्याच शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. पण त्याही दोन किंवा तीनच्या घरातच आहेत. तर बाकी सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांनी घेतला आहे.
गेल्या काही वर्षात अवयव दानाबाबत जनजागृती वाढली आहे. अनेक दाते पुढे येत आहेत. हे प्रमाण वाढत असले तरी अजूनही मोठ्या संख्येने दाते पुढे येण्याची गरज आहे. अशात करोना इफेक्ट म्हणून महिन्याभरापासून अवयव प्रत्यारोपण बंद आहे. मुंबईत दर महिन्याला किडनी अवयव प्रत्यारोपणाच्या 25 ते 30 शस्त्रक्रिया होतात. पण महिन्याभरापासून एक वा दोनच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळते आहे.
लिव्हिंग डोनर आणि ब्रेन डेड डोनर अशा माध्यमातून किडनी प्रत्यारोपण केले जाते. पण करोनाची भीती लक्षात घेता हे दोन्ही दाते पुढे येत नाहीत. आम्ही ही खबरदारी म्हणून प्रत्यारोपण करत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. किडनी रुग्ण डायलिसिसवर राहू शकतात. त्यामुळे सध्या प्रत्यारोपण बंद असले तरी त्याचा परिणाम किडनी रुग्णांवर होत नाही. मात्र, अन्य रुग्णांच्या जिविताची हमी कोणीही देऊ शकत नाही, हे वास्तव आहे.