नवी दिल्ली – दिल्लीत एका नऊ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. हत्या करून या मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्याचाहीं प्रकार घडला आहे.
या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी पुन्हा केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला असून त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला दहा लाखांची मदतही जाहीर केली आहे. या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री केजरीवालांनीही या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपली ही कन्या आता परत येऊ शकत नाही. पण तिच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, या कुटुंबाला आर्िर्थक मदत करून त्यांचे नुकसान भरून येणार नाही, पण तरीही दिल्ली सरकारतर्फे या कुटुंबाला दहा लाख रूपयांची मदत दिली जाईल.
तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक उपाययोजना कराव्यात अशी सुचनाही त्यांनी केंद्र सरकारला केली.
दिल्लीतल्या दक्षिण पश्चिम भागातील जुना नांनगल परिसरात ही घटना घडली आहे. ही मुलगी तेथे आपल्या आईवडिलांबरोबर राहात होती. शनिवारी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला ती आपल्या घरासमोरच्याच स्मशान भूमीत तेथील कुलर मधून पाणी आणण्यासाठी गेली होती.
त्यावेळी तेथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. नंतर स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचे विधी करणारा राजीव शाम आणि अन्य दोन तीन जणांनी तिच्या घरी जाऊन सदर मुलीला शॉक बसल्याने ती मरण पावल्याचे तिच्या आईवडिलांना सांगितले.
या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करून काहीही उपयोग होणार नाही असेही त्यांनी मुलीच्या आईवडिलांना सांगितले त्यामुळे तिच्यावर तातडीने अंत्य संस्कार करण्याची सुचना त्यांनी केली. या प्रकरणात नंतर मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर चार जणांना अटक केली. त्यांच्यावर बलात्कार व हत्येचा आरोप दाखल केला आहे.