नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी कॉंग्रेसवर टीका करून स्वताच्या सरकारचे अपयश झाकू शकत नाहींत असे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की आज देशात अनेक ठिकाणी मनरेगा म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे ठप्प आहेत. त्या कामासाठी ग्रामीण भागात लोकांना दारोदार भटकावे लागत आहे.
वाढत्या महागाईमुळे रोजगार हमीच्या नोकऱ्यांची मागणी वाढली पण सरकारने त्याचे बजेट कमालीचे कमी केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीबांची रोजगाराची संधी गमावली गेली आहे. मोदींना कॉंग्रेसवर त्यांना हवी तितकी टीका करावी पण गरीबांचे हक्क हिराऊ नयेत असे आवाहनही खर्गे यांनी केले आहे.
खर्गे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भारतातील आर्थिक संकट इतके खोल आहे की सप्टेंबरमध्ये मनरेगाची मागणी 4 वर्षात 30% वाढली आहे. यावर काहीही करण्याऐवजी, पंतप्रधान कॉंग्रेसला भाषणांमध्ये शिव्याशाप देत आहेत. त्याच्या भाषणांतून ते केंद्र सरकारचे दारूण अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु त्यातून लोकांपुढील समस्यांची स्थिती बदलणार नाही असेही ते म्हणाले. मनरेगाच्या अर्थसंकल्पात सध्या केवळ चार टक्के निधी शिल्लक असल्याची परिस्थिती आहे, असा दावा त्यांनी केला. 2023 च्या अर्थसंकल्पात, मोदी सरकारने मनरेगाच्या बजेटमध्ये 33 टक्के कपात केली होती, परिणामी गरीब कुटुंबे त्रस्त आहेत, विरोधी शासित राज्यांचा या योंजनेचे निधी वेळेवर दिला जात नाहीं. त्याची थकबाकीही मोठी आहे.