मुंबई – पाच राज्यांत झालेल्या निवडणुकींच्या वेळी विकासाच्या मुद्द्याच्या आधारावर भाजपला विजय मिळाला या दाव्यात तथ्य नाही. ही केवळ एक भाकडकथा आहे. हिजाब सारखे भावनिक मुद्द्यांचे राजकारण करून आणि मतांमध्ये पद्धतशील फाटाफूट करून भाजपने हा विजय मिळवला आहे असा दावा शिवसेनेने आपल्या अग्रलेखात केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मतांचे धृवीकरण, प्रचंड धुळफेक, आणि इतर बरेच काही हाताशी असल्याने भाजपला या निवडणुका जिंकता आल्या आहेत. मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट करण्यासाठी उत्तरप्रदेशात ओवैसी यांची योजना करण्यात आली. त्यांना तेथे मुद्दाम मदत करून नेण्यात आले.
ओवैसी यांच्या मार्फत हिंदु मतांचा रोख भाजपकडेच राहील याची काळजी घेतली गेली. पण हे आणखी किती काळ चालणार असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. या विषयी विचार करायलाही संधी दिली जात नाही कारण विचार करण्याची क्षमताच मारून टाकली जात आहे.
पाच राज्यांती विधानसभा निवडणुकीच्यावेळी हिजाबचा मुद्दा तापवला गेला. निवडणुका संपल्यावर लगेच हा मुद्दा बाजुला पडला. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तो पुन्हा उपस्थित केला जाईल. मोदी शहा आणि त्यांची झुंड निवडणुकीच्या राजकारणात बेफामपणे उतरते.
विरोधकांना पुर्ण नाहीसे करण्याच्या इराद्यानेच ते निवडणुकीच्या मैदानात उतरतात. अर्थात असे असले तरी कोणत्याही राज्याच्या निवडणुकांचा परिणाम देशाच्या लोकसभा निवडणुकीत होत नसतो असे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे त्याकडेही शिवसेनेने लोकांचे लक्ष वेधले आहे.