पिंपळवंडीत सर्वसाधारण सभा शांततेत
नारायणगाव – देश आणि राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये पतसंस्था चळवळ महत्त्वपूर्ण ठरली आहे. सर्वसामान्य माणसापासून उद्योजकांना पतसंस्था हक्काचा आधार ठरल्या असून जुन्नर तालुक्यात बॅंकांपेक्षा पतसंस्थेच्या ठेवी जास्त आहे, असे प्रतिपादन “शिवनेर भूषण’ पुरस्कार प्राप्त असलेले व आदर्श सरपंच म्हणून काम केलेले यशवंत नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ यांनी केले.
यशवंत नागरी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपळवंडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वसाधारण सभेस सभासदांची लक्षणीय उपस्थिती होती, त्यावेळी वाघ बोलत होते.
याप्रसंगी शरद लेंडे, मनोज काचळे, पिराजी टाकळकर, रावसाहेब चाळक, शुभांगी काकडे, बबन हडवळे, कुंडलिक काकडे, डी. सी. जाधव, वनराज शिंगोटे, हेमलता सोनवणे, बाळासाहेब काकडे यांनी मार्गदर्शन करताना यशवंत नागरी पतसंस्थेत गुंतवणूकदारांनी पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा, संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली असल्याचे म्हटले.
यावेळी संचालक फकीरभाई इनामदार, राजाराम घोटणे, संजय वाघ, बाळासाहेब काकडे, अशोक डुंबरे, संभाजी लेंडे, शरद फापाळे, प्रकाश तोतरे, रमेश कोकाटे, भरत शिंदे, ज्योत्स्ना लेंडे, वैशाली काकडे, रंजना मंडलिक, लक्ष्मण मंडलिक, हनुमंत पवार यांच्यासह संस्थेचे सल्लागार, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.
पतसंस्थांच्या कामात तरुणांनी सहभागी होऊन पतसंस्थेचे कामकाज शिकावे. काम करताना मनामध्ये जिद्द, प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची भूमिका ठेवून पतसंस्थांचे कामकाज करावे. ज्येष्ठ मंडळी तुमच्या पाठीशी उभी राहील. व्यवसायासाठी, वाहनांसाठी पतसंस्थेकडून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या कर्जधारकास तसेच सर्व कर्जधारकांना 10 टक्के तर सोनेतारणासाठी 9 टक्के दराने कर्ज वाटप करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मंडलिक यांनी केले तर आभार संजय वाघ यांनी मानले.
सामाजिक कार्यात “यशवंत’ अग्रेसर
करोना काळात यशवंत नागरी पतसंस्थेने स्वतंत्र विलगीकरण कक्षासाठी आर्थिक मदत करून रुग्णसेवा केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी व पोलिसांना मदत होण्यासाठी आळेफाटा चौकात उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. शैक्षणिक, क्रीडा यासह सामाजिक क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला जातो.
अशी आहे संस्थेची परिस्थिती..
यशवंत नागरी पतसंस्थेची 2022-23 आर्थिक वर्षात सभासद संख्या 5673 इतकी असून 81 कोटींच्या ठेवी, येणे कर्ज 45.90 कोटी, गुंतवणूक 51.32 कोटी, स्वनिधी 18.45 कोटी, खेळते भांडवल 104.61 कोटी तर नफा 1 कोटी 41 लाख 68 हजार आहे. संस्थेने प्रत्येक सेवेत चांगल्या प्रकारचा दर्जा व नियमितता ठेवल्याने प्रतिवर्षी आयएसओ: 9001- 2015 मानांकास पात्र ठरली आहे. संस्थेच्या पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळेफाटा व नारायणगाव येथे शाखा आहेत.
सभासदांसाठी 10 लाख व 40 लाखांचा अपघाती विमा काढलेला असून संस्थेच्या सेवकांची आरोग्य विमा पॉलिसी दरवर्षी काढण्यात येते. यशवंत नागरी पतसंस्थेने पिंपळवंडी येथे प्रशस्त व सुसज्ज इमारत बांधली असून नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर स्थलांतर करण्यात येणार आहे. करोना काळापासून बंद पडलेल्या यशवंत पुरस्काराचे वितरण नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभात केले जाणार असल्याचे सांगितले
निराशेचे ढग निवळून प्रगतीचा सूर्य उगवेल
कर्ज वसुलीसाठी त्रास होत असेल तर संस्थेचे अध्यक्षपद भूषविणे कठीण होते. कर्जदाराने नियमांचे पालन करून कर्जाची परतफेड करावी. पतसंस्थेतील पैसा सभासद, ठेवीदार व सर्वसामान्यांचा असल्याने कर्ज वसुलीसाठी विनाकारण त्रास देऊ नये. लवकरच थकीत कर्ज धारकांकडून वसुली केली जाईल व निराशेचे ढग निवळून प्रगतीचा सूर्य उगवेल असा आशावाद संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी व्यक्त केला.