पिलभीत – समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस हे दहशतवादाविरोधातील लढा सौम्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. या दोन्ही पक्षांचे नेते पूर्वी दहशतवादाच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या पक्षांच्या सदस्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी टीकाही शहा यांनी केली.
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना एका मुलाखतीमध्ये दहशतवादाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी “अशा निरुपयोगी मुद्द्यावरचर्चेसाठी आपल्याला वेळ नाही,’ असे उत्तर दिले होते, अशी आठवणही शहा यांनी सांगितली.
एका बाजूला प्रियंका गांधी दहशतवाद हा “फिजूल की बात’ असल्याचे म्हणतात, तर दुसरीकडे “अहमदाबाद स्फोटप्रकरणी पकडले गेलेले सिमीचे लोक निरपराध आहेत आणि त्यांना सोडून दिले पाहिजे,’ असे त्यांच्याच पक्षाचे नेते सलमान खुर्शिद म्हणतात. तेदेखील या दहशतवाद्यांची पाठराखण करतात, असेही शहा म्हणाले.
संकटमोचक मंदिर आणि लखनौ स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना सोडून देण्याचे वचन समाजवादी पार्टीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच दिले आहे. याचाही उल्लेख शहा यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला.