पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तीन परीक्षा नव्या पद्धतीने याच वर्षापासून सुरू होणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि आयोगाने त्वरित स्पष्टीकरण करावी, अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेची नवी पद्धतीची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून ऐवजी आणखी दोन वर्षांनी लागू करावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. असे असतानाही आयोगाने ही घोषणा केली आहे. त्यामुळे गोंधळात भर पडली आहे.
एमपीएससीची नवी परीक्षा पद्धत यावर्षीपासून लागू करू नये, या मागणीसाठी पुण्यासह राज्यभरात उमेदवारांनी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत राज्य सरकारने दोन पावले मागे घेत एमपीएससीला नवी पद्धत 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावी, असे कळविले आहे. त्यामुळे उमेदवारांनी जल्लोष करीत आंदोलन मागे घेतले. एमपीएससी ही स्वायत्तता संस्था आहे. नवी पद्धत कधी लागू करायची याचा सर्वस्वी निर्णय आयोगाला आहे. परंतु एकीकडे राज्य शासनाकडून विनंती होत असताना आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने 2023 पासून होतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे परीक्षेची नवी पद्धत याच वर्षीपासून लागू होणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
संभ्रम कायम
सध्या पीएसआय आणि राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे आयोगाचे सदस्य मुलाखतीत व्यस्त आहेत. त्यामुळे आणखी 15 दिवसांत आयोगाकडून स्पष्ट भूमिका जाहीर होईल, या विषयी शंका आहे. मात्र राज्य सरकारच्या सूचना आणि आयोगाकडून नवी पद्धत लागू या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवार मोठ्या संभ्रमात पडले आहेत. त्यासाठी आयोगाने त्वरित उमेदवारांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आता आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.