सणबूर – मुंबई, पुणे व इतर राज्यातून सर्वाधिक नागरिक हे पाटण तालुक्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुमारे 65 हजार तर चौथ्या टप्प्याच्या सुरवातीला सुमारे 9 हजार असे एकूण 74 हजार नागरिक तालुक्यात आहेत. बाहेरगांवाहून आलेले तीन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्याने धोका आणि काळजी दोन्ही वाढली आहे. त्यामुळे खबरदारी घ्या, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाटण तालुक्यात मागील दोन दिवसात करोनाचे तीन रुग्ण सापडले तर त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. दत्तात्रय डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सपोनि तृप्ती सोनावणे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सपोनि उत्तम भजनावळे, सपोनि एम.एस.बावीकट्टी यांची उपस्थिती होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे. बाहेर पडू नये. बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार असल्याचे मी वारंवार सांगत आलो आहे. करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गेली दोन-महिने पाटण तालुक्यात करोनाचा संसर्ग नव्हता. परंतू, अचानक तीन रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसात मुंबई शहरातून तालुक्यात आलेल्या बनपुरी येथील महिलेचे तसेच भारसाखळे येथील पुरुषाचे करोना पॉझिटिव्हमुळे मृत्यू आहे. त्यामुळे आता जे लोक बाहेरगांवाहून तालुक्यात आले आहेत.
बाहेरगांवाहून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी पोलीस आणि महसूल विभागाने गावभेट द्यावी.लोक घरातच कसे राहतील, यावर प्रशासनाने लक्ष द्यावे. पोलीस यंत्रणेला बंदोबस्ताकरीता यंत्रणा कमी पडत असेलतर जादा यंत्रणा देण्यात येईल. परंतू आता कुठलाही निष्काळजीपणा करु नका, अशा सुचना देसाई यांनी दिल्या.