नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नव्या वादात सापडले आहेत. या दोघांशिवाय अन्य काही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करत चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाबाबत बोलताना त्यांनी ही प्रक्षोभक भाषणे दिल्याचे या नेत्यांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राजकीय स्वार्थासाठी अशी विधाने करून दोन समुदाय/गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा आणि भारत सरकारविरुद्ध अविश्वास निर्माण केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आयपीसी कलम 121, 153 ए, 505 आणि 34 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या शुभरंभाला रष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना न बोलावल्याने आदिवासी समाजाचा आणि त्यांच्या जातीचा अवमान झाल्याचे या नेत्यांनी जाहीर वक्तव्य केले होते. हे वक्तव्य ट्वीटरसह सर्व समाजमाध्यमांतही प्रसिद्ध झाले होते.