मुंबई – महेंद्रसिंग धोनी याला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या मेंटॉरपदी नियुक्त केल्याला चोवीस तासही होत नाहीत तोच त्याच्याबाबत मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेकडून तक्रार करण्यात आली असून नियमांना डावलून ही नियुक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या तक्रारीत अर्थ नसून धोनी केवळ एक मार्गदर्शक म्हणूनच संघासह राहणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
धोनीची या पदावर नियुक्ती करताना बीसीसीआयने हितसंबंधांचा (कॉनफ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्ट) मुद्दाच लक्षात घेतलेला नाही असे संघटनेचे माजी सदस्य संजिव गुप्ता यांनी म्हटले आहे. याच नियमाचा आधार घेत त्यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये काहीच अर्थ नाही. धोनी केवळ मार्गदर्शक म्हणून संघासोबत असणार आहे.
तसेच विश्वकरंडक स्पर्धा ही आयपीएलचा उर्वरित स्पर्धा कालावधी संपल्यानंतर होणार आहे. त्याचप्रमाणे धोनी आयपीएलच्या पुढील मोसमात खेळेल का नाही ते सुद्धा अद्याप स्पष्ट नाही. मग त्याने कोणताही नियम डावललेला नाही, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.