बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील 10 गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना “दुष्काळी’ नुकसान भरपाई मिळणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर शासनाला “दुष्काळ भरपाई’ देण्याची सुबुद्धी सुचल्याने बाप्पा पावला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बांगरवाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, रानमळा, उंचखडक, आणे, आनंदवाडी, नळावणे, शिंदेवाडी व पेमदरा या 10 गावांतील बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी बेल्हे येथे बुधवारी (दि. 26) सायंकाळी झालेल्या बैठकीत दिली. याप्रसंगी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर, राष्ट्रवादी युवकचे जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अतुल भांबेरे, कृषी सर्कल अधिकारी गंभीरे, तलाठी विजय साळवे यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2018 मध्ये जुन्नर तालुक्यातील 6 महसूल मंडळे ही दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेली होती. यासाठी राज्यसरकारने नुकसानभरपाई देखील मंजूर केली होती; परंतु 6 मंडळे दुष्काळ यादीत असून देखील नुकसानभरपाई बाबत तालुका महसूल प्रसासनाने सरकारकडे प्रस्तावच न पाठवल्याने हजारो शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहिले होते.
याबाबत सरपंच जालिंदर बांगर यांनी आवाज उठवून वारंवार वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू केला होता. हक्काची नुकसानभरपाई न मिळाल्यास मुख्यमंत्री यांच्या पुढे शिवजयंतीच्या दिवशी जुन्नर येथे आत्मदहनाचा करण्याचा ईशारा त्यांनी दिला होता. यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी तात्काळ नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जुन्नर तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना दिले होते. त्यानुसार सतीश शिरसाठ यांनी बैठक घेत भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती दिली.