पुणे – अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीच्या परिणामामुळे हिवाळ्याच्या आगमनावर परिणाम होत असल्याने वातावरणातही तफावत जाणवत आहे. शहर परिसरात गेल्या दोन
दिवसापासून हवामान अंशत: ढगाळ असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. रविवारी (दि.7) देखील दिवसभर ढगाळ वातावरण होते, मात्र सायंकाळनंतर हवेत गारवा वाढल्याने थंडीची चुणूक जाणवत होती.
नोव्हेंबर महिना सुरू होताच थंडी पडण्यास सुरवात होते. यंदा मात्र अजूनही थंडीची प्रतीक्षाच सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रात,
मुंबईच्या नैऋत्येस 800 किमीवर आणि गोव्यातील पंजिमपासून नैऋत्येस 700 किमीपर्यंत कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार तयार झाला आहे.
या स्थितीचा प्रभाव राज्यात विशेषत: कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रावर दिसून येत आहे. परिणामी शहरातही दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत आहे.
हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकत असून, आगामी 48 तास त्याची तीव्रता कायम राहणार आहे. त्यानंतर ते हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे.