कोल्हापूर विधानसभेची पोटनिवडणूक येत्या मंगळवारी (ता.१२) होणार आहे. निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मैदानात उतरले. यावेळी ठाकरे यांनी, विरोधीपक्ष भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या सभेत महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्र्यानी यावेळी बोलताना कोल्हापूर ही मर्दांची भूमी असल्याचे सांगितले. शनिवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी पैलवान पृथ्वीराज पाटील याचे अभिनंदन देखील केले. कुस्तीवर भाष्य करत असताना यावेळी ठाकरे यांनी, भाजपला चांगलाच चिमटा काढला.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.”
पुढे बोलताना ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढत, “तरी नशीब ही निवडणूक आहे, राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.” असं वक्तव्य केलं.