मुंबई- भाजपाचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम असून हे सरकार पडणार नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते व भाजपाशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमय्यांसारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजपा नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
संजय राऊत यांनी जी पत्रकारपरिषद घेतली त्यात खूप वास्तव समोर आलेले आहे. आम्ही दुधाने धुतलेलो आहोत, असा हेका लावणारी भाजपा आज त्यांच्या भ्रष्टाचारांमुळे संपूर्ण उघडी झाली आहे. या निमित्त ईओडब्ल्यूच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या सगळ्याची चौकशी करून, योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी कॉंग्रेसची आहे.
तसेच,संजय राऊत यांनी सांगितलं आहे की ते सर्व कागदपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आम्ही देणार आहोत, तर त्यांनी देखील तातडीने ही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील पटोले यांनी यावेळी केली. याचबरोबर, ईडी बद्दल त्यांच्या जो मोठा आक्षेप जो होता, त्या आक्षेपात जर आपण पाहिले की काही बिल्डर्सना ब्लॅकमेल करून, ईडी पैसा जमा करते आणि जवळपास 300 कोटी रुपये यामध्ये त्यांनी जमा केलेले आहेत.
हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जमा केले जातात की अमित शाह यांच्यासाठी जमा केले जातात? हा देखील महत्वाचा विषय आहे. की या पद्धतीच्या संस्था त्यांना केंद्रातील सरकारचे संरक्षण असल्यावरच अशा प्रकारची कारवाई करत असतील हे देखील नाकारता येत नाही असा दावाही पटोले यांनी केला.