पुणे -संगमवाडी ते आळंदी रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या संगमवाडी ते विश्रांतवाडी डीपी रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आवश्यक असलेली 20 मीटरची जागा केंद्र व राज्य शासनाच्या अख्त्यारितील संस्थांच्या ताब्यात होती.
या दोन्ही संस्थांच्या जागा महापालिकेस मोफत देण्यात येणार आहेत. याबाबतचे राज्यशासनाचे आदेश नुकतेच जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला असून आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून धानोरी, कळस, विश्रांतवाडी, टिंगरे नगर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेकडून हा रस्ता सुमारे 6 किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ सर्वे ऑफ इंडिया आणि बालग्राम या संस्थांच्या जागेतील सुमारे 20 मीटर जागा ताब्यात नसल्याने शेवटच्या टप्प्यातील 600 मीटरचे काम झालेले नव्हते. त्यामुळे ही जागा मिळावी, यासाठी स्थानिक नगरसेवकांसह माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मागणी केली होती.
तसेच त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावाही करण्यात आला होता.मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महापालिकेने या जागेसाठी रेडीरेकनर प्रमाणे मोबदला द्यावा, असा अभिप्राय दिला होता.
तर ही रक्कम जास्त असल्याने डॉ. धेंडे यांनी स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही जागा महापालिकेस मोफत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन ही जागा पालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, ही जागा महापालिकेस विनामोबदला महापालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश महसूल विभागाने जिल्हा प्रशासनास दिले आहेत, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली. तसेच या उर्वरित रस्त्यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात 2 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा रस्ता लवकरच पूर्ण केला जाईल, असा विश्वासही डॉ. धेंडे यांनी व्यक्त केला आहे.