नगर – महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी पुष्पहार घालून अभिवादन करणे, त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलणे एवढेच नाही, तर महापुरुषांसह पक्षाच्या नेत्यांविरोधात कोणी बोलले तर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करणारी आंदोलने बस्स… एवढ्यापुरतेच नगर शहर भाजपचे अस्तित्व राहिल्याची चर्चा पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांसह नगरकरांमध्ये होत आहे. शहरातील प्रश्न आणि समस्यांबाबत काही देणे-घेणे नसल्यासारखेच पक्षाचे पदाधिकारी वागत असल्याने शहरात विरोधक औषधालाही उरला नसल्याचे चित्र आहे.
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असली, तरी महापालिका कार्यक्षेत्रात पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची वेळ आली. असे असतानाही भाजपकडून ही भूमिका बजावली जात नसल्याने शहरात कोण सत्ताधारी आणि कोण विरोधक हेच कळेनासे झाले आहे. महापालिकेत एखादा ठराव मंजूर करण्यासाठी त्यावर चर्चाविनिमय होणे गरजेचे असते. परंतु नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत सावेडी उपनगरात स्मशानभूमीसाठी जागा खरेदीचा ठराव फारशी चर्चा न करता अवघ्या 15 ते 20 नगरसेवकांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आला. काही नगरेसवकांसह कॉंग्रेस व शिंदे गटाच्या नगरसेवकांनी या ठरावाला विरोध करून राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपचे साटेलोटे चव्हाट्यावर आणल्यानंतर अनेकांनी यू-टर्न घेतला. यावरून समस्यांचे गांभीर्य पक्षाच्या नेत्यांना किती आहे, हे नगरकरांना कळून चुकले आहे.
या ठरावापेक्षाही शहरात अनेक गंभीर प्रश्न आणि समस्या आहेत. वर्षानुवर्षे त्या समस्यांना नगरकर दररोज सामोरे जात आहेत. मागील दीड वर्ष तर उड्डाणपुलाभोवतीच विकासाचे राजकारण फिरले. त्यानंतर काहींनी शहरातील रस्त्यांविषयी जाहीर बोलण्यास सुरुवात केली. शहरातील रस्त्यांची समस्या कधी न सुटणारे हे एक कोडेच आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते हे पाहूनही कोणाला काहीच फरक पडत नाही. खड्डे आणि धुळीमुळे नगरकरांचे आजार वाढले, व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला; पण रस्त्यांचा प्रश्न जैसे थेच आहे. शहरात कोट्यवधी रुपयांची पाणीयोजना राबविण्यात येत आहे. एका तपाहून अधिक काळ झाला, तरी फेज टू ही वाढीव शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ शकली नाही. आजही पाण्यासाठी नगरकरांना वणवण करावी लागत आहे.
नगरकरांना पुरेसे व मुबलक पाणी महापालिका देऊ शकत नाही. एवढी लाजीरवाणी गोष्ट असताना त्याचे गांभीर्य लोकप्रतिनिधींना नाही. आज शहरातील एकाही रस्त्यावर पथदिवे चालू नाहीत. रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न सोडविता आलेले नाही, तर अन्य प्रश्न व समस्यांबाबत न बोलणेच बरे!
एवढे असताना शहरातील विरोधक म्हणून भाजपने काय भूमिका बजावली, असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून कामे करून घेण्यासाठी विरोधच राहिलेला नसल्याचे भाजपच्या कार्यपद्धतीवरून दिसून येत आहे. केवळ जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच फोटो प्रसिद्ध होत आहेत. शहराच्या समस्यांबाबत पक्षाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची खंत नगरकर व्यक्त करीत आहेत.
भाजप बनले ताटाखालचे मांजर!
केंद्र व राज्यात सत्ता असल्याने नगरकरांच्या भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु शहरातील मूलभूत प्रश्न आणि समस्यांबाबत काही देणे-घेणे नसल्यासारखेच पक्षाचे पदाधिकारी सध्या वागत आहेत. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरविताना भाजपने चुकीच्या निर्णयांना विरोध करण्याऐवजी तेही या निर्णयात सामील होत असल्याने भाजप सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्याची चर्चा नगरकर करत आहेत.
शहरातील रस्ते, पाणी, वीज, कचरा संकलन आदी प्रश्नांबाबत वारंवार निवेदन दिले आहे. आजवर शंभर निवेदन देऊन झाली आहेत. या निवेदनाद्वारे आंदोलनाचे इशारेदेखील दिले आहेत. येणाऱ्या काळात पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याची पक्ष भूमिका घेणार आहे. आता राज्यात पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून महापालिकेने जरी कामे केली नाही, तर थेट राज्य सरकारच्या माध्यमातून कामे करून नगरकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील.
महेंद्र गंधे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप