पिंपरी – चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने सखोल चौकशी केली. त्यामध्ये एक लाखांच्या खंडणीसाठी खून केल्याची कबुली आरोपीने दिली. वारंवार आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र नवीन समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसही चक्रावले आहेत.
बपीलअहमद रईस लष्कर (वय 26, सध्या रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मण बाबूराम देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. बपीलअहमद हा मूळचा आसाममधील सिलचर जिल्ह्यातील आहे. आरोपीने वेगवेगळी कारणे आणि उडवा-उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची भरपूर दिशाभूल केली. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता त्याने खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली.
आरोपी बपीलअहमद याने सीएनसी प्रोग्रामिंग केले होते व सध्या तो तळेगाव येथे ऑपरेटर म्हणून कामाला होता. सध्या त्याला 18 ते 20 हजार रुपये पगार होता. मात्र परदेशात गेल्यावर त्याला 70-80 हजार पगार मिळणार होता. त्यासाठी त्याला पासपोर्ट, व्हिसा आणि तिकीटासाठी एक लाख रुपयांची आवश्यकता होता. लक्ष्मण याचे अपरहरण करून तो त्यांच्या आई-वडिलांकडे एक लाखांची खंडणी मागणार होता. घड्याळाचे आमिष दाखवून त्याने लक्ष्मणला काही अंतर नेलेही. मात्र त्याच्या पायात काटा मोडल्याने तो खाली पडला. तो रडू लागल्याने त्यास पडक्या जागेत नेऊन दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.