देशाचे भवितव्य उज्ज्वल
वैकोम (केरळ), दि. 20 – जरी गेले दोन वर्षे देशावर असलेला अंधार अजून दूर झालेला नसला, तरी देशाचे भवितव्य “उज्ज्वल’ आहे, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काढले. येथे “वैकाम सत्याग्रहा’च्या सुवर्णमहोत्सव समारंभाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. (अस्पृश्यतेच्या विरूद्ध हा सत्याग्रह झाला होता) इंदिराजी म्हणाल्या, जगातील जवळजवळ प्रत्येक देशात सध्या भाववाढ, बेकारी, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई व चलनवाढ ही संकटे आहेत. तरीही भारतासारख्या जो देश गरीब असतो, त्याच्यावर हा ताण अधिक पडतो.
पाकने पुन्हा हल्ला केला, तर तो आत्मघात
जयपूर – पाकिस्तानने जर पुन्हा भारतावर हल्ला करण्याची चूक केली, तर तो आत्मघातच ठरेल, असे संरक्षणमंत्री स्वर्णसिंग म्हणाले.
पर्यायी पक्ष तयार करण्याचे प्रयत्न सुरू – वाजपेयी
हैद्राबाद – येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला शह देण्यासाठी पर्यायी सामूहिक पक्ष निर्माण व्हावा यासाठी येत्या अधिवेशनातच संसदेत
कम्युनिस्टेतर पक्षांच्या खासदारांचा एक गट स्थापन करण्यात येईल, असे जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले. जनसंघ, सं. कॉंग्रेस, भालोद आणि समाजवादी खासदारांचा मिळून हा गट असेल.
रेडिओ कलावंतांना
नोकरीची शाश्वती हवी
पुणे – वेतन श्रेणीबाबत जॉब इव्हॅल्यूएशन कमिटीच्या शिफारशी त्वरित अमलात आणण्याची मागणी आकाशवाणी कलावंतांच्या परिषदेत आज करण्यात आली. बढती, निवृत्ती वेतन वगैरे सोयीही कलावंतांना देण्याची मागणी करण्यात आली.