मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. यावरून महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्य आणि केंद्रातील विकासाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता तिन्ही पक्षांनी मिळून मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून भक्कमपणे सरकारची वाटचाल पुढे सुरू आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी हास्यास्पद आहे. मंत्री राहिलेल्या माणसाने सत्ताधाऱ्यांकडे २१० आमदारांचे संख्याबळ असताना राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं हास्यास्पद आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते.”
काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात ?
महाराष्ट्र राज्यात ज्या पध्दतीने भाजपने सरकार बनवले आहे, ज्या पध्दतीने राज्याचा कारभार सरकारकडुन चालला आहे आणि ज्या पध्दतीने सर्व विभागात भ्रष्टाचार सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यात सर्वसामान्यांनाही राष्ट्रपती राजवट लागु झाली पाहिजे असे वाटते. कॉंग्रेस म्हणुन आम्ही राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी केली आहे, असे स्पष्ट मत माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.