आपचे आव्हान: केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा मुद्दा ठरणार कळीचा
नवी दिल्ली -भाजपने दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) दिले आहे. त्यातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व हा मुद्दा आपकडून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत लावून धरला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. आता त्यासाठी काही महिनेच बाकी असल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातून आप विरोधकांची आणि प्रामुख्याने भाजपची कोंडी करण्यासाठी पुढे सरसावला आहे. आपच्या दाव्यानुसार ज्येष्ठ नेते विजय गोयल यांच्यासह तिघे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होण्यास इच्छूक आहेत. त्याचा संदर्भ देत आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपला आव्हान दिले. दिल्लीतील जनतेला भाजपकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. त्यामुळे मी गोयल यांना पत्र पाठवले. तीन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याने नेमके कुणाला पत्र पाठवायचे याबाबत मी संभ्रमात होतो.
मात्र, त्यातील सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून गोयल यांना पत्र पाठवले. त्यात तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. दिल्लीकरांना मोफत वीज पुरवण्याबाबत आणि पाणी बिलाची थकबाकी माफ करण्याबाबत भाजप अनुकूल आहे का, यासंबंधी दोन प्रश्न विचारले आहेत. केजरीवाल यांचा मुकाबला करण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, असा तिसरा प्रश्न विचारण्यात आला असल्याचे सिंह यांनी सांगितले. गोयल यांच्याकडून 24 तासांत उत्तर अपेक्षित असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. आपने भाजपला दिलेल्या आव्हानामुळे दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल यांचे नेतृत्व हा कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.