न्यायालयात हजर राहण्याचे राहुल गांधींना आदेश
मुंबई : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणावरून केलेली टीका महागात पडणार आहे. कारण आता या प्रकरणावरून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राहूल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, या दाव्यानुसार या प्रकरणाची फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच राहुल गांधींना 3 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहे.
राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राफेल प्रकरणात कमांडर इन थीफ, चौकीदार चौर है, चोरो का सरदार अशा टीका केल्या होत्या.राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेमुळे भाजप आणि त्यांच्या सदस्य, कार्यकर्त्यांच्या प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप या प्रकरणी करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमाळ यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राहुल गांधी यांनी जयपुर, अमेठी आणि राजस्थान दौऱ्या दरम्यान, या टीकांचा वापर केल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.