शर्मिला जगताप
विवाहसंस्थेला सर्वच राष्ट्रांनी एकमताने धर्माचे अधिष्ठान दिले आहे; परंतु रोमन लोकांच्या बाबतीत धर्म आणि राष्ट्रनीती यांची फार दृढ सांगड घातलेली आढळून येते. विवाहाचेही तसेच होते. विवाह करणे हा धर्मही मानला जाई आणि राष्ट्रीय कर्तव्यही समजले जाई. रोमन सम्राट ऑगस्टस व त्याच्या पत्नीने विवाहदेवता ज्यूनो हिच्या देवालयांचे पुनर्वसन केले, याचा अर्थ हा की, ऑगस्टसच्या शासनाला विवाहसंस्थेचे अतिशय महत्त्व वाटत होते.
रोमचे राज्यकर्ते आणि धर्मगुरूही रोमन पुरुषाचा रोमन स्त्रीशी होणारा विवाह अति उच्च व पवित्र मानीत. रोमन पुरुषाचा अथवा स्त्रीचा परक्या स्त्रीशी अथवा पुरुषाशी होणारा विवाह त्यांना गौण वाटे. परंतु विवाह संस्थेच्या पावित्र्याबद्दलचा व सोवळेपणाबद्दलचा रोमन लोकांचा हा विचार कालांतराने फार शिथिल झाला. त्याला कारणेही तशीच घडली.
पूर्वेकडील ग्रीक लोकांचा प्रदेश रोमने जिंकल्यावर रोमन वंशाचे हे तुटकपण अथवा सोवळपण टिकविणे अशक्यप्राय झाले. अथेन्स, सॅमॉस अथवा इफीसस या शहरांतल्या स्त्रियांच्या गुणसंपदेची व आकर्षक लीलांची रोमन सैनिकांना फारच भुरळ पडे. आपल्या रोमन बायकांची राहणी त्यांना तुच्छ वाटे. परंतु परदेशातील स्त्रियांशी विवाह करण्याची त्यांना सक्त मनाई होती.
आपल्या स्त्रियांची गुणवत्ता शिक्षणाने वगैरे वाढविण्याचा विचार त्यांच्या मेंदूत शिरत नसे.
ते आपल्या बायकांच्या मनावर पुनःपुन्हा असेच बिंबवीत की, नृत्य, गायन वगैरे कला संपादन करणे हे कलावंतीणीचे काम, गृहस्थी स्त्रियांनी त्या फंदात पडता कामा नये. अशी ताकीद आपल्या बायकांना द्यावयाची आणि आपला स्वतःचा रिकामा वेळ चैनीत घालविण्यासाठी कलावंतीणीचा अथवा गनिकांचा आश्रय करावयाचा असा शिरस्ता रोमन लोकांमध्ये पडला. ग्रीक गनिकांची आयात रोममध्ये फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागली व या अनीतीचे दुष्परिणाम राष्ट्रीय पातळीवर जाणवू लागले.
वरच्या थरातले सुसंस्कृत रोमन लोक अविवाहित राहण्यात धन्यता मानू लागले. रोमन स्त्रियांवरही याचा प्रतिकूल परिणाम झाला. आधीच रोमन स्त्रियांना कसलेही हक्क नसत. गुलामांची जी अवस्था तीच स्त्रियांची. पुरुषांनी त्यांना कसेही वागवावे, वाटल्यास टाकून द्यावे.
यावर कसलाही कायदेशीर इलाज रोमन स्त्रीला उपलब्ध नव्हता. अगदी किरकोळ अपराधासाठीसुद्धा पतीपुढे तिची चौकशी होई; शूद्र कारणासाठी, त्यांचे तारुण्य व सौंदर्य कमी झाले या सबबीवरसुद्धा त्यांना घटस्फोटित करण्यात येई.
इ. स. पूर्वी 131 साली मेटेलस मॅसिडोनियस हा सेन्सॉर असताना त्याने स्त्रीबाबत मत मांडले की, पत्नीवाचून आपल्याला जगता आले असते तर ती आपण खचितच टाळली असती. निसर्गाचा असा सिद्धांत आहे की, पत्नीवाचून पुरुषाला जीवन जगता येऊ नये.
वाढत्या घटस्फोटामुळे शुद्ध रक्ताच्या रोमन लोकांची संख्या कमी होऊ नये म्हणून सम्राट ऑगस्टसची धडपड सतत चालली होती. त्यासाठी घटस्फोटाच्या मार्गात कायद्याने अनेक अडचणी उभ्या करण्यात आल्या. घटस्फोटाची मान्यता मिळाली व जोडपे बंधमुक्त झाले तर
पुन्हा विशिष्ट कालावधीत अविवाहितांनी लग्न केलेच पाहिजे या कायद्याच्या कात्रीत ते सापडत. शिक्षेला भिऊन स्त्रीपुरुष वैवाहिक जीवन जगत असत. रोमनमध्ये स्त्रीपुरुषांना वैवाहिक जीवनात परतण्यासाठी व विवाह संस्था टिकवण्यासाठी असे अनेक कायदे करावे लागले.