नवी दिल्ली – चीनने सीमेवर उभारलेल्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून सरकार देशाचा विश्वासघात करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आहे. चीनची लडाख मधील ही घुसखोरी भयानक स्वरूपाची आणि अत्यंत धोकादायक आहे असा इशारा एका अमेरिकन वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिला होता. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली आहे.
चीन भारत विरोधी कारवायांच्या उद्देशाने लडाख मध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे पण त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाचा विश्वासघातच आहे असे गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही सांगितले की, पूर्व लडाखमध्ये तसेच सीमेच्या खोल भागात चीनद्वारे पायाभूत सुविधांच्या उभारणीवर तसेच त्यांच्या सीमावर्ती भागातील घडामोडींवर भारत बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
यूएस आर्मीचे पॅसिफिक कमांडिंग जनरल चार्ल्स ए फ्लिन यांनी लडाखमधील चिन कडून सुरू असलेली पायाभूत सुविधांची उभारणी भारतासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यावर मात्र भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. चीन सीमेवरील परिस्थिती हाताळण्यावरून राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्ष सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.