मुंबई – विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
यासंदर्भातील प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला आहे. हा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असून या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पावसाळी अधिवेशनातच घ्यावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेसने केली होती. तसेच भाजपकडूनही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा अध्यक्ष कोण होणार?
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खुर्चीवर कोण विराजमान होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष कॉंग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील कॉंग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.