सातारा, (प्रतिनिधी)- धावडशी (ता. सातारा) येथील श्री ब्रह्मेंद्रस्वामी विद्यालयात श्रोत्री कुटुंबीयांच्या पुढाकाराने ग्रंथालयाची उभारणी होत असून या ग्रंथालयात मुलांना आवडतील अशी निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, कविता संग्रह, कथा, कादंबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे आदी विषयांची मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चार हजार पुस्तके उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन या उपक्रमातून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
या ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ उद्या शनिवार दि. २५ मे रोजी सकाळी दहा वाजता श्री क्षेत्र धावडशी येथे शाळेच्या प्रांगणात होणार आहे. कोल्हापूर येथील साहित्यिक आणि थोर विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. प्रशांत रसाळ, कूपर कार्पोरेशनचे नितीन देशपांडे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल.यावेळी श्रीराम नानल, अशोक वाळिंबे, शिरीष चिटणीस, अजित कुबेर, अविनाश जोशी (वाई), ज्येष्ठ संपादक वासुदेवराव कुलकर्णी (कोल्हापूर), बंडोपंत राजोपाध्ये (विटा), माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम आदींची प्रमुख उपस्थिती आहे.
या शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून सहा वर्षांच्या काळात शाळेच्या विकासाला गती देणारे कै. गजाननराव श्रोत्री यांची स्मृती कायमस्वरूपी असावी म्हणून एक सुसज्ज ग्रंथालय उभे करावे, असे श्रोत्री कुटुंबीयांनी ठरवले. सातारा शहरातील सुप्रसिद्ध शल्यविशारद आणि साहित्यिक डॉ. संदीप श्रोत्री यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या साहित्यप्रेमी समूहामध्ये आवाहन केले. बघता बघता चार हजार पुस्तके, कपाटे आणि इतर शालोपयोगी साहित्य जमा झाले. त्यामध्ये ठाणे येथील सौ. आशा पंडित, डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पी. यांचे भरीव सहकार्य लाभले.
ग्रंथालयात चार हजार पुस्तके तसेच दोनशेपेक्षा जास्त चिकटवह्या जमा झाल्या आहेत. पुणे येथील तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक दिवंगत दे. द. वाडेकर यांची अनमोल ग्रंथसंपदा या ग्रंथालयाला लाभली आहे. या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘कै. दे. द. वाडेकर व कै. गजाननराव श्रोत्री स्मृती ग्रंथालय’ चा उद्घाटन समारंभ उद्या दि. २५ मे रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश पेंढारकर, बाळासाहेब साळुंखे, मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी आणि श्रोत्री कुटुंबीयांनी केले आहे.
शाळेला नवी ओळख मिळणार…
सातारा शहराजवळील श्री क्षेत्र धावडशी येथील श्री ब्रह्मेंद्रस्वामी विद्यालय गेली ३८ वर्षे उत्तम कार्य करत आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते कै. डॉ. विठ्ठलराव पेंढारकर यांनी १९८३ मध्ये ही शाळा स्थापन केली. शाळेचा विस्तार करण्यात त्यांच्या जोडीला काही मोजक्याच व्यक्ती होत्या.
त्यापैकीच कै. गजाननराव दत्तात्रय श्रोत्री. ते शाळेचे पाहिले मुख्याध्यापक आणि अधीक्षक. पाचवीमध्ये प्रवेश घेतलेला मुलगा दहावी होऊन बाहेर पडेपर्यंत सहा वर्षे ते या शाळेमध्ये पाय रोवून उभे होते. आज या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के असतो. शंभर टक्के संगणकीकरण झालेली ही सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. आणि आता वाचन संस्कृती रुजवणारी शाळा म्हणून ही शाळा ओळखली जाणार आहे.