सातारा, (प्रतिनिधी)- शनिवार पेठेतील श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातील कबुतराच्या ढाबळीचे अतिक्रमण तातडीने न काढल्यास माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांनी उद्या दि. 24 मे रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्या मनातील खदखद आंदोलनाच्या निमित्ताने बाहेर पडत असून पालिका प्रशासन राजकीय दबावात काम करत असल्याचा आरोप होत आहे.
साताराविकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष झालेल्या स्मिता घोडके यांनी त्यांच्या कार्यकाळात शनिवार पेठेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दीड कोटी रुपये खर्चून हे क्रीडा संकुल विकसित केले. त्यामध्ये वॉकिंग ट्रॅक तसेच विविध स्वरूपाची खेळणी, सभागृह असे हे संकुल समृद्ध केले. आता या संकुलावर कबुतराच्या ढाबळीचे अतिक्रमण झाले आहे.
ही ढाबळ नगर विकास आघाडीच्या एका माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्याची आहे. हीच कबुतराची ढाबळं राजकीय वादाचे केंद्र बनली आहे. यासंदर्भात स्मिता घोडके यांनी मुख्याधिकारी व प्रशासक अभिजित बापट यांच्याकडे वारंवार तक्रार केली.
मात्र, केवळ राजकीय दबावातून पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप स्मिता घोडके यांनी केला आहे. ही कबुतराची ढाबळ हटली नाही तर दि. 24 मे रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पाच दिवसांपूर्वी हे निवेदन पालिका प्रशासनांना देऊनही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
हे क्रीडा केंद्र कबुतराची ढाबळ ठेवण्याचे ठिकाण नाही. तसेच येथे कबुतरे उडवणारी बरीच पोरे येतात. कबुतरांच्या विष्ठा, त्यांची पिसे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना धोकादायक आहेत. त्यामुळे ती ढाबळ हटवली जावी असा आग्रह स्मिता घोडके यांनी वारंवार धरला. तरीही प्रशासनाने त्यामध्ये चालढकल केली. ही चालढकल आता वादावादीचा केंद्रबिंदू बनला आहे.
या कबुतराच्या ढबळीवरून सातारा विकास आघाडी विरुद्ध नगर विकास आघाडी पुन्हा आमने-सामने आले आहेत. सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले व नगर विकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मनोमिलन शब्द समोर ठेवून भाजपचे एकत्रितरित्या काम केले. मात्र, मनोमिलनाचा हा पाझर दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये स्त्रवलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या वादावादी मनोमिलनाला अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे.
क्रीडा संकुलाला ओंगळवाणे स्वरूप
या संकुलात लोकांसाठी क्रीडांगण असताना विनापरवाना विवाह समारंभ होत आहेत. तक्रारी झाल्यानंतर नगरपालिकेने या क्रीडांगणाची रीतसर भाडेपावती करण्याचा उद्योग सुरु केला.
याला स्मिता घोडके यांनी आक्षेप घेतला. येथील खेळण्यांची मोडतोड झाल्याची तक्रार आहे. विवाह समारंभानंतर पत्रावळी इतर राडारोडा तसाच पडतो. कचरा व राडारोडा यामुळे जिजाऊ क्रीडा संकुलाला ओंगळवाणे स्वरूप येत आहे, अशी घोडके यांची तक्रार आहे.
योग्य कार्यवाही करु – अभिजित बापट
यासंदर्भात मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निवेदनाची दखल घेण्यात आली असल्याचे सांगितले. जिजाऊ क्रीडा संकुल तातडीने स्वच्छ करण्यात येईल. तसेच यासंदर्भात योग्य ती कार्यवाही नक्कीच करू, कोणावरही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन त्यांनी नगरपालिकेच्यावतीने दिले.