कराड – खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी विकासकामांसंदर्भात स्वतंत्रपणे चर्चा झाली. दोन्ही राजे विकासकामांसाठी आग्रही आहेत. सातारा जिल्ह्यातील सिंचनाच्या आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. दोघांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहे. काही मुद्द्यांवरून अशा प्रकारच्या गोष्टी कधी कधी होत असतात. यात काही गंभीर गोष्ट नसल्याचे मत देवेंद्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
भाजपच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक मलकापूर (कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये गुरुवारी झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सातारा बाजार समितीच्या जागेतील भूमिपूजनावरून झालेल्या वादाबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी विकासकामांसंदर्भात सुमारे तासभर चर्चा झाली. त्यांच्यात असलेल्या वादाचा परिणाम इतर गोष्टींवर होणार नाही.
राज्यातील वीजदरवाढीच्या प्रश्नावर ते म्हणाले, कोठेही जादा दर आकारणी करण्यात आलेली नाही. पहिल्या दरानुसारच शेतकऱ्यांना सबसिडी दिली जात आहे. ग्राहकांकडून एक रुपया 15 पैसे आणि दीड रुपया यानुसार वीजदर आकारणी केली जात आहे. दरवाढ केली असली, तरी तेवढे अनुदान राज्य सरकार महावितरण कंपनीला दिले जात आहे. सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांबाबत ते म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यात येणार आहे. या कामांना चालना मिळणार असून प्रशासकीय मान्यता आणि निधीबाबत चर्चा करण्यात आली. या कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता देऊन, कामांना गती देण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरमध्ये म्हसवड येथे अत्याधुनिक औद्योगिक वसाहत तयार करण्यात येत आहे. त्याबाबतही बैठक झाली आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली असून, जमीन अधिग्रहण लवकरच करण्यात येणार आहे. त्याचा मोबदला देण्यासही केंद्र सरकारने होकार दिला आहे.
पंढरपुरात या, पण राजकारण करून नका
तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाला येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, पंढरपूरमध्ये कोणीही येऊ शकते. तेथे भक्तिभावाने यावे; परंतु त्याचे राजकारण करू नये. केवळ राजकारणासाठी कोणीही येऊ नये.
-========================