वर्धा: भिवंडी येथून स्थलांतरित मजुरांना घेऊन अलाहाबादला निघालेल्या बोलेरो गाडीचा वर्ध्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 33 मजूर जखमी झाले असून यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांसाठी नियमावलीदेखील जारी केली आहे. याशिवाय सरकार हळूहळू रेल्वे किंवा बसमार्फत मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्याचं नियोजन करत आहे. मात्र, करोनाच्या भीतीमुळे मजूर मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही मजूर भिवंडी येथून बोलेरोने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. ही गाडी भरधाव वेगात होती. नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सूटला. त्यामुळे बोलेरो गाडी जागेवरच पल्टी झाली. या दुर्घटनेत तब्बल 33 मजूर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.