अमरावती- अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत काही धरणग्रस्तांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी काही धरणग्रस्तांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.
ही सभा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे आयोजीत करण्यात आली होती. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच 20 ते 25 जणांनी “निषेध असो…’ अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. योग्य मोबदला आणि पुनर्वसन न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसमोर गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. घोषणाबाजी करणाऱ्या लोकांची जमीन धरणात गेली असून या लोकांना आपल्या जमिनीचे द्यावेत, अशी या आंदोलकांची मागणी आहे.
दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा पुन्हा सुरळीत पार पडली. एकीकडे काही लोकांकडून निषेध-निषेध नारे दिले जात होते, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते मोदी-मोदीची घोषणाबाजी करत होते. मात्र या सर्व प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी काही वेळ मोठा गोंधळ उडाला.