चंदीगड – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांना तासाभरात नाहीसे केले जाऊ शकते असे प्रक्षोभक वक्तव्य हरियानातील भाजपचे आमदार लिलाराम गुजर यांनी केले आहे. आपल्या मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
नागरिकत्व कायद्याचे समर्थन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, आजचा भारत हा काहीं मनमोहनसिंग,पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींचा भारत नाही. हा भारत मोदी शहांचा भारत आहे. एका इशाऱ्यावर याला विरोध करणाऱ्यांचा सफाया होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा ईशारा मुस्लिमांना उद्देशून होता असाही अर्थ लावला जात आहे. ते म्हणाले की या कायद्याला कोणीही विरोध करण्याचे कारण नाही. भारतातील मुस्लिमांना यातून त्रास होणार नाही. पण शेजारील देशांतून बेकायदेशीरपणे आलेल्या मुस्लिमांना हा देश सोडावाच लागेल. गुजर हे गेल्या ऑक्टोबर मध्ये झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांना पराभूत करून विधानसभेवर निवडून आले आहेत.