शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न अयशस्वी
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, आम्ही मोदींचा गौरव करू! – शिवसेना
मुंबई – भाजप पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारला दोनवेळा पत्र पाठवली आहेत. केंद्रात भाजपाचेच सरकार आहे. मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी एवढा उशीर का, असा सवाल करत आधी सावरकरांना भारतरत्न द्या! त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तुमच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही आणतो, असे सडेतोड उत्तर देत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून राजकारण करणाऱ्या भाजपचा डाव शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडण्यावरून विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान झाले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व स्थगनचे प्रस्ताव फेटाळले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजपाने विधानसभेत सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुनगंटीवार यांनी तो प्रस्ताव अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला होता. मात्र ही स्थगनची सूचना होऊ शकत नसल्याचे सांगत अध्यक्षांनी मुनगंटीवार यांना प्रस्ताव वाचून दाखविण्यास सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. देशासाठी त्यांनी अनन्वित यातना भोगल्या. त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र असली तरी कर्मभूमी संपूर्ण जग आहे. भाजपाला इतक्या वर्षांत आताच हा प्रस्ताव मांडण्याची गरज का भासली असा प्रश्न काही जण विचारतात. पण काही लोक असे आहेत की त्यांच्या देहावर दुसऱ्याच्या मेंदूचे नियंणत्र आहे, हे लोक सावकरांविषयी अवमानजनक वक्तव्य करीत असल्याने म्हणूनच हा प्रस्ताव मांडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. याला आक्षेप घेत छगन भुजबळ यांनी नियमांवर बोट ठेवत कोणते व्यक्रोक्तीपूर्ण, अपमानास्पद वक्तव्य करता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
कॉंग्रेसच्या “शिदोरी’वर बंदी घाला – फडणवीस
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरवपर प्रस्ताव मांडण्यात काय अडचण आहे असा सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिदोरी या कॉंग्रेसच्या मासिकात सावरकरांविषयी अतिशय अवमानकारक लेख छापण्यात आला आहे. त्यांच्यावर अश्लाघ्य आरोप करण्यात आले आहेत. शिवसेनेचे याला समर्थन आहे काय असा सवालही त्यांनी केला. शिदोरी या मासिकावर तत्काळ बंदी घालण्यात यावी व सावरकरांविषयीचा गौरव प्रस्ताव संमत करण्यात यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली.यावेळी भाजपाचे आमदार आक्रमक झाले. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. सरकारचा निषेध करणारे फलक फडकावरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या.
शिवसेनेचे प्रत्युत्तर
एकीकडे भाजप सदस्यांकडून गौरव प्रस्तावाचे राजकारण केले जात असताना याला संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी जोरदार आक्षेप घेतला. अध्यक्षांनी प्रस्तावाची तापसणी करून यावर निर्णय द्यावा. त्याचप्रमाणे प्रस्तावावर नितेश राणे यांचेही मत जाणून घ्यावे, असे सांगतानाच शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी केली आहे. तेव्हा आधी सावरकरांना भारतरत्न द्या, भारतरत्न दिल्यानंतर आम्ही तुमचं आणि मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असा जोरदार टोला अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप सदस्यांना लगावला.
सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही?
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सुरू असलेल्या राजकारणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा पत्र लिहून वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. भाजपाला यातून वेगवेगळे मुद्दे काढून राजकीय स्वार्थ साधायचाय का हे आपल्याला माहिती नाही. मग सावरकरांना भारतरत्न देण्यास वेळ का लागतो याचे उत्तर मिळाले पाहिजे. वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी आमचीही मागणी आहे. राज्य सरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही, असा सवाल करत त्यांना हा पुरस्कार मिळावा म्हणून भाजपाने पण प्रयत्न करावेत आम्ही पण करू असे अजित पवार म्हणाले.
सावरकरांचा अवमानाचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील
शिदोरी मासिकातील सावकरांविषयीचा मजकूर फडणवीस यांच्याकडून वारंवार वाचून दाखवण्यात येत होता. याला जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. शिदोरीतील मजकूर वाचून दाखवत विरोधी पक्षनेते सावरकरांचा अवमान करीत आहेत. भारतरत्नसारखा सन्मान देण्याचा विचार करता आणि त्यांच्याविषयी सभागृहात वाईट वाचून दाखवता हे योग्य नाही. अशा गोष्टी करून भाजपकडून सावरकरांचा अपमान होत असल्याचे सांगून हे थांबविण्याची मागणी जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.
कामकाज बंद पाडण्याचा भाजपचा डाव उधळला
सलग तिसऱ्या दिवशी भाजपकडून घोषणाबाजी करून सभागृहाचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न झाला. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजप सदस्य आज पुन्हा वेलमध्ये आले. “सावरकर अमर रहे’च्या घोषणा देत शिदोरी मासिकाची झेरॉक्स फाडत कागद हवेत भिरकावण्यात आले. पोस्टरबाजी, फलकबाजीही करण्यात आली. अध्यक्षांनी पोस्टर दाखवू नयेत अशा सूचना दिल्यानंतरही घोषणाबाजी सुरूच होती. आशीष शेलार यांनी सदस्यांना वेलमध्ये बसायला लावून प्रति विधानसभाच सुरू केली. मुनगंटीवार तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाषणेही देण्यात आली. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. पाच विधेयके मंजूर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद केले.