संगमनेर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय वादाचा असेल, तर वाद-प्रतिवाद असतात. ज्या ठिकाणी वाद असतो, तेथे प्रतिवाद केलाच जातो. प्रतिवादाला प्रत्येकाने उत्तर दिलेच पाहिजे. परंतु भाजप मात्र प्रतिवाद करायला तयार होत नसल्याची टीका आ. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केली.
आ. थोरात म्हणाले की, आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ही तीन पक्ष किमान कार्यक्रम हातात घेऊन एकत्र आलो. प्रत्येक पक्षाचे मत-मतांतर आणि विचारधारा वेगवेगळी असू शकते. आमच्यात वाद-प्रतिवाद होतात. मात्र, आम्ही येथून मागे किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करीत होतो. यापुढेही करीत राहू.
कॉंग्रेसचे युवा नेते खा. राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय हा प्रश्न उपस्थित केला असता याला भाजपने उत्तर द्यायला हवे होते. मात्र, उत्तर न देता त्यांचा थेट आवाजच कसा बंद करता येईल यावरच भाजप जोर देत असल्याची टीका आ. थोरात यांनी केली. राज्यघटनेत सत्ताधारी आहे, तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांचे काम जसे देश किंवा राज्य चालवणे असते तसे कुठे चुकत असेल तर त्यावर बोट ठेवण्याचे काम विरोधकांचे असते. मात्र, विरोधक कोणी बोलले की लगेच त्यांचा आवाज कायमस्वरूपी बंद करायचे काम एकमात्र भाजपच्या नेत्यांचे सुरू झाल्याचा आरोप आ. थोरात यांनी या वेळी केला.
फूट पडणार नाही : आ. थोरात
भाजपचा महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्यात फूट पडणार नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारितच काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.