पाटणा – बिहारमधील विषारी दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून 26 वर पोहचली. त्या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. दारूबंदी लागू असतानाही आणखी एक दुर्घटना घडल्याने बिहारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याने त्या राज्यातील राजकारण तापले आहे. एकप्रकारे, विषारी दारू दुर्घटनेने जणू बिहारमधील राजकारणच झिंगले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून त्या राज्यात एप्रिल 2016 मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. आता विषारी दारूमुळे जीवितहानी होण्याची आणखी एक घटना घडल्याने राजकीय विरोधकांकडून नितीश यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना नितीश यांनी दारूबंदीचे समर्थन केले. माझ्या इच्छेसाठी नव्हे; तर महिलांच्या व्यथा विचारात घेऊन दारूबंदी लागू करण्यात आली. त्या निर्णयामुळे अनेक घरे आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त होण्यापासून वाचली. तो निर्णय समाजहिताचा आहे, असे ते म्हणाले. जो पियेगा, वो मरेगा, असे म्हणत त्यांनी विषारी दारू टाळण्याचा इशारा दिला.
नितीश यांनी दिलेल्या इशाऱ्याची भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी खिल्ली उडवली. देशात कोट्यवधी लोक मद्यसेवन करतात. त्या सर्वांनी मरावे काय, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. मद्यसेवन करणारे महापापी आहेत. ते भारतीय असू शकत नाहीत अशा प्रकारची शेरेबाजी नितीश यांनी याआधी केली होती. जीवितहानी होत असताना मुख्यमंत्र्यांनी तशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे, असेही सुशील यांनी म्हटले.
विषारी दारू दुर्घटनेवरून बिहार सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या भाजपवर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जोरदार पलटवार केला. भाजपशासित राज्यांमध्ये विषारी दारूमुळे सर्वांधिक बळींची नोंद होते. ते प्रमाण मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये सर्वांधिक आहे. दारूबंदी असणाऱ्या गुजरातमध्येही बिहारपेक्षा वाईट स्थिती आहे, असा दावा त्यांनी केला.