नागपूर – मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी बीड ( Beed voilence ) व माजलगावात झालेल्या हिंसाचारावरून शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ( Jayant patil ) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. जयंत पाटलांनी हा हिंसाचार गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचा आरोप केला. त्यावर फडणवीस ( Devendra fadanvis ) यांनी या प्रकरणी दोषी आढळलेल्या सर्वांवर मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
जयंत पाटील या प्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरताना म्हणाले की, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या पोलिस अधीक्षकांना जिल्ह्यात काहीतरी होऊ शकते असा इशारा देण्यात आला होता. त्यांना यासंबंधीची माहिती देण्यात आली होती. पण त्यांनी हलगर्जीपणा केला. माजलगावात सकाळी प्रकाश सोळंके यांचे घर पेटवण्यात आले. त्यावेळी तिथे पोलिस उपस्थित असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बीड शहर जळत असतानाही जिल्हा पोलिस अधीक्षक बीडला गेले नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोलिसांची संख्या कमी असल्याचा दावा केला. पण त्यात काही तथ्य नाही. पोलिस लोकसंख्येच्या तुलनेत नेहमीच कमी असतात. जमाव ५ हजारांचा असला तरी पोलिस ५० असतात. त्यांनी हल्लेखोरांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही?, असेही जयंत पाटील यांनी विचारले.
हल्लेखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आले. जयदत्त क्षीरसागर, सोळंके यांची घरे जाळण्यात आली. जमाव संपूर्ण शहरात फिरत होता. त्यांना नंबर देण्यात आले होते. मी स्वतः ७ ते ८ वेळा फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. संदीप क्षीरसागर यांच्या घरात त्यांची बायको-मुले होती. ते सुद्धा फोन करत होते. पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. पण त्यानंतरही ती झाली नाही. याचे कारण फडणवीस यांनी सभागृहाला सांगावे, असे जयंत पाटील म्हणाले.
पप्पू शिंदे व त्याची गँग…
या प्रकरणी पप्पू शिंदे नामक एक आरोपी आहे. तो एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे. हा पप्पू शिंदे व त्याची गँग ही सर्व काही करत होती. मंत्री छगन भुजबळ बीडला जाऊन आले. पण गृहमंत्री गेले नाही. फडणवीस यांनी पप्पू शिंदेंचे कुणाशी साटेलोटे आहे हे सांगावे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळल्याचे स्पष्ट झाले, असेही पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
दोन दिवसांत एसआयटी स्थापन करू
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. ते जयंत पाटलांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही दस्तावेज पडताळून पाहा, कोणतीही माहिती किंवा अलर्ट पोलिसांना मिळाला नाही. या प्रकरणी व्हायरल झालेली क्लिप वेगळी होती. पोलिसांनी स्थितीचा आढावा घेऊन गोळीबार केला नसेल. आंतरवाली सराटीत ७० पोलिस जखमी झाले. तेव्हा झालेल्या लाठीचार्जवरून राज्यातील मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केले. तरीही सभागृहाची इच्छा असेल तर पुढील २ दिवसांत या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाईल. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही, असे फडणवीस यावेळी ठणकावत म्हणाले.