वाल्हे पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल
वाल्हे – जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये तीन जणांना मारहाण झाल्याची घटना पिंगोरी येथे घडली. न्यायालयाचा मनाई आदेश मोडल्याबद्दल सागर मोरे (सुतार) व किर्ती मोरे (सुतार) यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याचे वाल्हे पोलीस दुरक्षेत्राचे हनुमंत गार्डी यांनी सांगितले.
पिंगोरी (ता.पुरंदर) येथे वादग्रस्त शेतजमिनीच्या वहिवाटीमध्ये अडथळा न आणण्याचा न्यायालयाचा मनाई आदेश धुडकावून वहिवाटदारांना शेतात जाऊन कुऱ्हाडीने व कुऱ्हाडीच्या तुब्यांने जबर मारहाण करणाऱ्या येथील दांपत्याविरोधात जेजुरी पोलीस दुरक्षेत्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलीसांनी सांगितले की, पिंगोरी (ता. पुरंदर) येथील मिलिंद संपत यादव यांचे चुलते हरिचंद्र दशरथ यादव यांची शेत जमीन गट नंबर 40/2 व 43 मध्ये वहिवाटत असून त्या जमिनीच्या वहिवाटीबाबत सासवड न्यायालयामध्ये दावा सुरू आहे. त्या अनुशंगाने न्यायालयाने वरील वहिवाटीमध्ये प्रतिवादी सागर राजेंद्र मोरे (सुतार) यास अडथळा न आणण्याबद्दल मनाई आदेश दिला होता.
मात्र, न्यायालयाचा आदेश धुडकावून सागर मोरे याने मिलिंद यादव यांच्या आई अंजना संपत यादव, अरुणा हरिश्चंद्र यादव आणि मिलिंद संपत यादव यांच्यावर कुऱ्हाडीने व त्यांच्या तुब्यांने प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार वाल्हे पोलिसात मिलिंद संपत यादव यांनी दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.