रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला असणार्या गावात स्वीट होमचा सुळसुळाट झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फूड, जंक फूडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ विकले जातात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रांजणगाव येथील एका स्वीट होममधून मुलांना खाण्यासाठी नेलेल्या मिठाईत मेलेली अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
शिरुर तालुक्यात सध्या झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं असुन महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून कामगार वर्ग औद्योगिक वसाहतीत पोटाची खळगी भरण्यासाठी येत आहे. शिरुर तालुक्यात कोरेगाव भिमा, वढु बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव गणपती आणि करडे परिसरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या असुन त्यामध्ये लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे या औद्योगिक वसाहतीच्या परीसरातील गावांमध्ये मोठया प्रमाणात स्वीट होम आणि छोटया छोटया टपर्यावर फास्ट फुड तसेच जंक फुड खाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. परंतु यामध्ये मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार आहेत का? याची खात्री न करताच सर्वसामान्य लोक हे खाद्यपदार्थ खाऊन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु त्यामुळे गंभीर आजरांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे स्वीट होम किंवा टपरीवरुन कोणताही खाद्यपदार्थ विकत घेताना त्याचा दर्जा तपासणे गरजेचे आहे.
रांजणगाव गणपती येथील जय भवानी मिठाईवाले या स्वीट होममधून 14 मे रोजी एका ग्राहकाने लहान मुलांना खायला मिठाई नेली होती. त्यामध्ये मेलेली अळी सापडल्याने त्या ग्राहकाने याबाबत स्वीट होम चालविणार्या व्यक्तीला याबाबत जाब विचारला. त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तर दिली; मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर मात्र स्वतःची चूक मान्य करत मिठाईत मेलेली अळी असल्याचे मान्य केले.
अन्न, औषध विभागाची डोळेझाक… ?
पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात हा सगळा सावळा गोंधळ चालु असताना अन्न आणि औषध प्रशासन विभाग याबाबत डोळेझाक कां करत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. शिरुर तालुक्यात जेवढे स्वीट होम आहेत. त्यांच्याकडे फूड लायसन्स आहेत का? त्यामध्ये पदार्थ दर्जेदार बनवले जातात का? याची तपासणी होणे गरजेचे आहे.
अन्यथा फास्ट फूड आणि जंक फूडच्या नावाखाली दर्जाहीन पदार्थ विकून सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबणार कधी असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांशी संर्पक साधला असता उडवा उडवीची उत्तरे देऊन प्रतिक्रिया देण्याचे टाळले.