रेडा -करोनाचे थैमान कमी झालेले नाही. करोनाची दुसरी लाट पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये एका दिवसात लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. करोना संपलेला आहे, असे न वागू नये. मास्कचा वापर करावा व काळजी घ्यावी, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात करोना व अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शनिवारी (दि. 31) आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गावडे, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. सुहास शेळके, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, दिलीप पवार, बांधकाम विभागाचे अभियंता बाबूराव जाधव, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, नगरसेवक पोपट शिंदे, बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, हेमा पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यामध्ये करोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दीत जाऊ नये, तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा. विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांकडून सक्तीचा दंड वसूल करावा यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत. फळे, भाजीपाला व इतर पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने हयगय करू नये. शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा असणाऱ्यास पंचनाम्यासाठी 72 तासांचा कालावधी असतो. मात्र वीज यंत्रणा खंडित झाल्यामुळे ती मुदत आपण दहा दिवसांची केली आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही.
जलसंपदा, जलसंधारण, बांधकाम विभाग, महावितरण यांच्याद्वारे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडे पाठवल्यानंतर लवकरच दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करणार असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजने अंतर्गत तालुक्यातील एकूण 3 लाख 57 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये एकूण 132 नागरिक करोना बाधित आढळले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली तर शहरातील एकूण 6664 कुटुंबाची तपासणी करण्यात आल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
शहरातील दुभाजक तातडीने दुरुस्त करा
इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीनंतर अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. त्यामध्ये शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यामधील दुभाजक तुटून व उखडून नुकसान झाले होते. या दुभाजकांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ शहरातील दुभाजक दुरुस्ती करून घ्यावेत, असे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी दिले.