नाणे मावळ – नाणे मावळातील गावांमध्ये सध्या साथीचे आजार वाढू लागले आहे. सर्दी, खोकला, थंडी, ताप यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. वातावरण बदल, पावसाळ्यामुळे हवेत असलेली आद्रता, प्रदूषण यामुळे साथीचे आजार उद्भवत आहे. नागरिकांनी अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी.
सद्यस्थितीत शहरात करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परिणामी पूर्वीच्या तुलनेत शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी, गर्दी वाढली आहे. पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावाकडील नागरिकांनी शहरात आवश्यक असल्यास काळजी घेत ये-जा करावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील खड्डे, अडगळीची जागा, सभोवतालीच्या मोकळ्या जागेतील गवत अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार होते. या डबक्यांमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते.
या डासांमुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यू यासारखे आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे. तर दूषित पाणी पिण्यात आल्याने गॅस्ट्रो, कॉलरा यासारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहे. वातावरणातील बदल प्रदूषित हवाही या आजारांचे प्रमुख कारण ठरत आहे.
परिणामी काही दिवसांपासून गावागावात सर्दी, खोकला, थंडी, ताप या आजारांचे रुग्ण वाढले आहे. दरम्यान कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण होत आहे. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार सुरू करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.