बारामती – अंगावर पाणी उडवल्याचा राग मनात धरून केलेल्या खून प्रकरणातील चौघांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे .ए. शेख यांनी सहा वर्ष सश्रम कारावास व १० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. भांडगाव ता. दौंड येथे (२०११) मध्ये ही घटना घडली होती.
दि.२३ मार्च २०११ रोजी मनीषा महेंद्र नागवडे (रा. खामगाव ता. दौंड जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती. दि. २२ मार्च २०११ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा आकाश, भावाचा मुलगा अक्षय, बहिणीचा मुलगा श्रीनाथ असे घरासमोर असलेल्या गेटजवळ गप्पा मारत बसलेले असताना सगळी मुले नदीवर पोहण्यास गेल्यावर त्यांचे कडून सतीश नागवडे याच्या अंगावर पाणी उडाल्याचे कारणावरून आरोपी १) राजेंद्र भगवान मोडक २) जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येळवंडे ३) सतीश विष्णू नागवडे ४) विजय सावळा तांबे ५ ) अविनाश रमण शेळके ६) बाळासाहेब बबन ढमाळ ७) दिलीप रंगनाथ सावंत (सर्व रा.खामगाव ता. दौंड जि.पुणे) यांनी पोहताना पाणी उडालेचे कारणावरून बहिणीचा मुलगा श्रीनाथ विजय लेंडगे यांस व इतर सर्वाना आरोपी यांनी काठीने, हाताने व लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली होती. सदर मारहाणीत श्रीनाथ लेंडगे यांस जबर मार लागल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासमोर सुरू असलेल्या खटल्यात आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने सदर गुन्ह्यामध्ये दोषी धरून आरोपी राजेंद्र भगवान मोडक, जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येळवंडे , सतीश विष्णू नागवडे , विजय सावळा तांबे यांना ६ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रु.दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
अविनाश रमण शेळके , बाळासाहेब बबन ढमाळ, दिलीप रंगनाथ सावंतयांची सबळ पुराव्याअभावी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षी ,पुरावे तसेच सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सध्याचे केस अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केला असून, सहा फौज नलावडे, पोलीस नाईक विजय ढोपरे यांनी त्यांना केस कामी मदत केली.