कराड -सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर-आष्टा मार्गावर मंगळवारी सकाळी भरधाव डम्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत कराडजवळील हजारमाची येथील पिता-पुत्र अंकुश शिवाजी साळुंखे (वय 40) व आदित्य (वय 14) हे जागीच ठार झाले, तर अंकुश यांची पत्नी सोनाली (वय 34) गंभीर जखमी झाली आहे. याच मार्गावर गेल्या महिन्यात झालेल्या कार अपघातात कराडजवळच्या मलकापुरातील एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मूत्यू झाला होता. त्याच मार्गावर बापलेकाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी, हजारमाची येथील अंकुश हे पत्नी सोनाली, मुलगा आदित्य यांच्यासह मोटारसायकल (एमएच-50-आर-1676) वरून आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते. अहिरवाडी फाटा येथील वळणावर मोटारसायकल आली असता, आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव डम्परने चुकीच्या बाजूला जाऊन मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अंकुश व आदित्य हे जागीच ठार जाले.
या अपघातात सोनाली या गंभीर जखमी झाल्या आहे. बेदरकार डम्परचालकाने वाहन न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पलायन केले. अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली होती. गेल्या महिन्यात याच रस्त्यावरील तुजारपूर फाटा येथे झालेल्या अपघातात मलकापूर आगाशिवनगर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर एका आठवड्यापूर्वी बावची फाटा येथील अपघातात सांगलीतील युवक ठार झाला होता. या रस्त्यावर 15 दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत.