मुंबई – करोनाच्या काळात भारतीय बॅंकांनी कामगिरी करून जनतेच्या गरजांची पूर्तता केली आहे. त्याचबरोबर या काळात बॅंकांनी कार्यक्षमता सुधारून स्वतःची परिस्थिती मजबूत केली आहे. आता रशिया- युक्रेन युद्धामुळे अशाच काही अडचणी येत आहेत. त्यामुळे बॅंकानी सावध राहून स्वतःची परिस्थिती सुधारावी आणि जनतेच्या गरजा पूर्ण कराव्यात अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने केल्या आहेत.
रिझर्व बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत सध्याची आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, डेप्युटी गव्हर्नर राजेश्वर राव उपस्थित होते. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे भारत आयात करीत असलेल्या विविध वस्तूंचे दर वाढत आहेत. त्यामुळे वाढणारी महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेबरोबरच इतर देशातील रिझर्व बॅंकांनीही बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत.
या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना दास म्हणाले की जागतिक परिस्थितीचा भारतीय बॅंकिंग क्षेत्रावर परिणाम होऊ नये यासाठी बॅंकांनी पुढाकार घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये भांडवल उभारणीचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बॅंकांनी उत्तम कामगिरी करून स्वतःचे ताळेबंद नफादायक केले आहेत. आगामी काळात या ताळेबंदावर परिणाम होणार नाही याची बॅंकांनी पुढाकार घेऊन काळजी घ्यावी.
करोनाच्या काळामध्ये भारताचा विकास दर जास्त घसरु नये यासाठी भारतातील बॅंकांनी ज्याप्रमाणे यशस्वी प्रयत्न केले. त्याप्रमाणे आगामी काळातही भारतीय विकास दरावर जास्त परिणाम होऊ नये यासाठी बॅंकांनी प्रयत्न करावेत. हे करीत असताना ग्राहकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. ग्राहकाच्या तक्रारी काही प्रमाणात वाढत आहेत. या तक्रारी सोडविण्यासाठी असणारी यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्याचबरोबर बॅंकांनी तंत्रज्ञान स्वीकारून स्वतःची कार्यक्षमता वाढवत राहण्याची गरज आहे. लवकराच देशांमध्ये काही डिजिटल बॅंक शाखा सुरू होणार आहेत. त्या संदर्भात केल्या जात असलेल्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.