बेलसर -पुरंदर तालुक्यामध्ये सद्यस्थितीला पहाटेला थंडी, सकाळी ढगाळ हवामान आणि दिवसभर उष्णता या लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या रब्बी हंगाम शेवटच्या स्थितीला म्हणजे काढणी आणि मांडणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटून जावू नये, यासाठी शेतकरी सध्या चिंता व्यक्त करीत आहेत.
तालुक्यामध्ये सध्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा व इतर फळबागा त्यासोबतच भाजीपाला शेतात उभी आहेत. रब्बी पिके सध्या काढणीच्या जवळपास आहेत. काही ठिकाणी गहू, ज्वारी, हरभरा यांच्या काढण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी मागास पेरणीमुळे ती पिके अजून शेतात उभी आहेत.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार तालुक्यामध्ये कुठलीही पावसाची शक्यता नाही; परंतु ढगाळ हवामानामुळे तालुक्यात असलेल्या भाजीपाला आणि फळबागांवर मावा त्यासोबतच रसशोषक किडींचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्याबद्दल काळजी घेण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञ देतात.
हवामानाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार पुरंदर तालुक्यात 26 मार्च पर्यंत हवामान कोरडे व ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 48 टक्के तर दुपारची 13 टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 13 ते 14 कि.मी. दरम्यान राहील.
काढणी, मळणी झाली सोपी
सध्या तालुक्यामध्ये हार्वेस्टर आणि हालरद्वारे मळणी केली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचे हार्वेस्टर गहू पिकाची हार्वेस्टिंग करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. तर आधुनिक पद्धतीच्या हार्वेस्टरद्वारे ज्वारी, हरभरा, मका आणि इतर पिकांच्या मळणीसाठी सोप्या पद्धतीत वापर केला जात आहे. त्यामुळे अलीकडील आधुनिक युगात शेतकऱ्यांना काढणी व मळणी अधिक सोपी वाटू लागली आहे.
अशी काळजी घ्या
सध्याच्या हवामानात रब्बी पिकांना व फळबागांना छक्याचे नुसार व उपलब्धतेप्रमाणे पाणीपुरवठा करावा. पक्व रब्बी पिकांची काढणी करून घ्यावी. मळणी व काढणी केलेल्या पिकांची प्रतवारी करून ती चांगल्या उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावीत. सद्यस्थितीला पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी लवकर पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.